गोल्डन आय न्युज नेटवर्क
आदिवासी कला, संस्कृतीला वगळून विश्वात्मक कल्याणाचा विचार अशक्य : डॉ. श्रीपाल सबनीस !!
बहुरंग आयोजित 17व्या आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवाचा समारोप !!
पुणे : आदिवासींची कला, संस्कृती वगळून विश्वात्मक कल्याणाचा विचार करणे अशक्य आहे. जंगलातल्या आदिवासी संस्कृतीला बाहेरच्या जगाशी जोडून घेणे, आदिवासींना आपलेसे करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. आदिवासी कला, संस्कृतीकडे दुर्लक्ष करणे ही आदिवासी नेत्यांनी समाजाशी केलेली बेईमानी आहे, असा आरोपही त्यांनी केला.
बहुरंज आयोजित 17व्या आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सत्रात दीप प्रज्वलन करताना श्रीनिवास भणगे, मेघराज राजेभोसले, डॉ. कुंडलिक केदारी, राज अग्रवाल आदी.
आदिवासी जमातीची सामाजिक, सांस्कृतिक वैशिष्ट्ये, वेगळेपणा, त्यांची बोली भाषा, चालीरिती, जीवनशैली, धार्मिक कार्ये, देवदेवता, रुढी-परंपरा, कला, संगीत, नृत्य यातील वेगळेपणा सामान्य प्रेक्षकांना समजावा या उद्देशाने बहुरंगतर्फे पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे आदिवासी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता. समारोप सोहळ्यात डॉ. सबनीस अध्यक्षपदावरून बोलत होते.
दोन दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते आणि प्रसिद्ध नाटककार श्रीनिवास भणगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. तर समारोप अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे अध्यक्ष देवेंद्र मोरे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या उपस्थितीत झाला. बहुरंग, पुणेचे अध्यक्ष आणि चित्रपट महोत्सवाचे संयोजक डॉ. कुंडलिक केदारी, सामाजिक कार्यकर्ते राज अग्रवाल उपस्थित होते.
आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेल्या महिषासुराचे पूजन आणि दीप प्रज्वल करून महोत्सवाचे उद्घाटन आणि समारोप सत्राची सुरुवात झाली. आदिवासी संस्कृतीतील शेला आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत डॉ. केदारी यांनी केले.
प्रास्ताविकात चित्रपट महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका व्यक्त करताना डॉ. कुंडलिक केदारी म्हणाले, आदिवासींची कला, संस्कृती सर्वसामान्य नागरिकांना समजावी यासाठी शासकीय अनुदानाविना गेल्या 17 वर्षांपासून महोत्सव आयोजित करीत आहे.
आदिवासींच्या कला, संस्कृतीबाबत निश्चित धोरण असावे, यासाठी पाठपुराव करीत असून राज्यातील चित्रपट महोत्सवात आदिवासी संस्कृतीविषयी चित्रपट आला तर त्याचा शासनस्तरावर गौरव व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.उद्घाटन सत्रात बोलताना श्रीनिवास भणगे म्हणाले, चित्रपटाला जशी गोष्ट असते त्याचप्रमाणे चित्रपटाच्या गोष्टीपलिकडेही एक गोष्ट असते. चित्रपटाचा आत्मा जाणून घेतल्यास चित्रपट आवडू लागतील, चित्रपटांविषयी आपुलकी निर्माण होईल.
बहुरंज आयोजित 17व्या आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवाच्या समारोप सत्रात दीप प्रज्वलन करताना डॉ. श्रीपाल सबनीस, देवेंद्र मोरे, डॉ. कुंडलिक केदारी, राज अग्रवाल आदी.
आदिवासी चित्रपट महोत्सवाला अनुदान मिळण्यासाठी पाठपुरावा करू तसेच भविष्यात महोत्सव भरविण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून सहकार्य करू अशी ग्वाही मेघराज राजेभोलसे यांनी दिली.
आदिवासींची संस्कृती, इतिहास जपण्याचे काम डॉ. केदारी यांनी आदिवासी चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून केले असल्याचे मत देवेंद्र मोरे यांनी समारोप समारंभात व्यक्त केले. महोत्सवासाठी शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले.
राज अग्रवाल यांनी आदिवासी चित्रपट महोत्सवाच्या आयोजनाबद्दल केदारी यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भालचंद्र सुपेकर यांनी केले तर आभार धीरज केदारी यांनी मानले.
जाहिरात