गोल्डन आय न्युज नेटवर्क
वैद्यक शास्त्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा : डॉ. आनंद देशपांडे !!
डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘आरोग्यसेवेतील डिजिटल आणि एआय क्रांती’ पुस्तकाचे प्रकाशन.!
पुणे : आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) आणि डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे सर्वच क्षेत्रात आश्चर्यकारक क्रांती घडली आहे. यात आरोग्य क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात क्रांती घडत आहे. गेल्या 20 वर्षांत बायोसायन्स विषयात मोठ्या प्रमाणात प्रगती झाल्यामुळे जीवशास्त्र ही तंत्रशाखा झाली आहे. आजच्या काळातील डॉक्टरांनी फक्त वैद्यकीय क्षेत्रापुरते मर्यादित न राहता वैद्यक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. औषधीशास्त्र आणि डेटा सायन्स विषयात भारतात खूप मोठ्या प्रमाणात काम होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पर्सिस्टंट सिस्टिमचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे यांनी केले.
‘आरोग्यसेवेतील डिजिटल आणि एआय क्रांती’ पुस्तक प्रकाशन प्रसंगी उपस्थित (डावीकडून) विशाल सोनी, भरत अगरवाल, डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. आनंद देशपांडे, प्रा. मिलिंद जोशी, डॉ. संजय चोरडिया, डॉ. दीपक शिकारपूर, संदीप तापकीर.
डॉ. अविनाश भोंडवे व डॉ. दीपक शिकारपूर लिखित आणि विश्वकर्मा पब्लिकेशन प्रकाशित ‘आरोग्यसेवेतील डिजिटल आणि एआय क्रांती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी (दि. 14) डॉ. देशपांडे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सहभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी होते. डॉ. शिकारपूर यांचे हे 55वे, तर डॉ. भोंडवे यांचे 23वे पुस्तक आहे.
सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी व विश्वकर्मा गु्रपचे अध्यक्ष भरत अगरवाल, सीईओ विशाल सोनी, संपादक संदीप तापकीर व्यासपीठावर होते.
डॉ. देशपांडे म्हणाले, भारतातील वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संशोधन होऊन भारतातील रुग्णांच्या वैद्यकीय माहितीचे संकलन होणे आवश्यक असून यासाठी परकीय रुग्णांच्या वैद्यकीय माहितीवर अवलंबून राहू नये.
जिटल क्रांतीत मानवता, नैतिकता, सर्वसमावेशकता जपली जावी : प्रा. मिलिंद जोशी
प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपचार घेत गंभीर आजाराशी सामना करताना रुग्णांना डॉक्टरांबरोबरच्या संवादातून दिलासा मिळत असतो. आरोग्य सेवेतील डिजिटल क्रांतीचे स्वागतच आहे. त्यामुळे तपासण्या, निदान आणि उपचार यात सुलभता येणार असली तरी या क्रांतीत मानवता, नैतिकता आणि सर्वसमावेशकता जपली जावी, अशी अपेक्षा प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.
डॉक्टर आणि संगणक तज्ज्ञांनी मिळून लिहिलेले पुस्तक हा अभिनव प्रयोग आहेे. तंत्रज्ञान मानवी संवेदनेची जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे डिजिटल क्रांती झाली तरी डॉक्टरांचे महत्व थोडेही कमी होणार नाही. 90च्या दशकानंतर मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी उत्तम लिखाण करणारे डॉ. शिकारपूर व डॉ. भोंडवे हे महत्त्वाचे लेखक आहेत. पुस्तक तांत्रिक माहिती स्वरूपात नसून ते ललितरम्य देखील आहे. जाणिवांचा परिघ विस्तारण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक, तंत्रज्ञ व सामान्य वाचकांची ज्ञानलालसा-जिज्ञासू वृत्ती वाढविण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल असेही ते म्हणाले.
डॉ. भोंडवे म्हणाले, गेल्या तीस ते चाळीस वर्षांत देशातील वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे. डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वैद्यकीय क्षेत्रात मानवाला होणारा उपयोग वाचकांसमोर आणण्यासाठी या पुस्तकाची निर्मिती केली आहे.
डॉ. शिकारपूर म्हणाले, डिजिटल तंत्रज्ञान अत्यंत वेगाने विकसित होत आहे. वैद्यकीय सेवेचा दर्जा वाढविण्यासाठी आज डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. कोव्हिड योद्ध्यांना हे पुस्तक समर्पित केले आहे.
‘आरोग्यसेवेतील डिजिटल आणि एआय क्रांती’ या विषयावरील लिखाण अत्यंत प्रेरणादायी व औत्सुक्य वाढविणारे आहे, असे सांगून भरत अगरवाल म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने आरोग्य क्षेत्र जास्त सक्षम बनेल. अशा विषयांवरील पुस्तकांची समाजाला गरज आहे.
डॉ. संजय चोरडिया म्हणाले, सध्याच्या काळात अनेक क्षेत्रात डिजिटल क्रांती घडत आहे. हे बदल अत्यंत प्रेरणादायी आणि नाविन्यपूर्ण आहेत. शहरीभागातील विद्यार्थी तंत्रज्ञानातील बदल सहजतेने स्वीकारू शकतात, परंतु अशा पुस्तकांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना या ज्ञानाचा लाभ व्हावा.
मान्यवरांचा सत्कार भरत अगरवाल यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता चित्रे यांनी केले तर आभार संदीप तापकीर यांनी मानले.
जाहिरात