गोल्डन आय न्यूज नेटवर्क
ब्रह्मनाद संगीत महोत्सवातील स्वरवर्षावात रसिक चिंब.!!
पुणे : युवा कलाकारांचे सहगायन, शब्दप्रधान गायकी दर्शविणारे दादरा, ठुमरी तसेच किराणा घराण्याचे बहारदार गायन असा सुरेल संगम साधत ब्रह्मनाद संगीत महोत्सवाचा अखेरचा दिवस रसिकांसाठी स्वरवर्षावात चिंब भिजवून टाकणारा ठरला.
ब्रह्मनाद कला मंडळ आणि धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान, धायरी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय 24व्या ब्रह्मनाद संगीत महोत्सवाचे आयोजन कै. बंडोजी खंडोजी चव्हाण विद्यालयातील राजमाता जिजाऊ माँसाहेब बहुउद्देशीय सभागृहात करण्यात आले होते. रविवारी रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या महोत्सवाला रसिकांनी भरभरून दाद देत महोत्सवातील स्वरानंद लुटला.
पहिल्या सत्राची सुरुवात सुप्रसिद्ध युवा गायक सुरंजन व शुभम खंडाळकर यांच्या सहगायनाने झाली. सुमधूर आवाज, दमदार गायन सादर करत खंडाळकर बंधूंनी राग मुलतानीतील ‘गोकुल गाव कछु नाही’ ही सदारंग रचित बंदिश सादर केली. द्रुत लयीत ‘सुंदर सूरज नवा साजे रे’, ‘आयी मोरे साजनवा’ या बंदिशींनी मैफलीत रंगत आणली.
संत मिराबाई रचित आणि वडिल व गुरू पंडित रघुनाथ खंडाळकर यांनी स्वरबद्ध केलेले ‘ओ राधे देवो बांसुरी मोरी सुरिली’ या हिंदी भजनाने राधा-कृष्णाच्या भावनिक अनुबंधाची सुंदर मांडणी केली. माधव लिमये (संवादिनी), ऋषिकेश जगताप (तबला), माऊली फाटक (पखवाज), दिगंबर आसमारे, आर्या लोहकरे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
भारतीय संगीत क्षेत्रात शास्त्रीय गायनाबरोबरच उपशास्त्रीय गायनाचीही महान परंपरा आहे.
या परंपरेचे विलोभनीय दर्शन घडविताना गुरू शोभा गुर्टू यांच्या गायकीची झलक विदुषी राजश्री पाठक यांनी सादर केलेल्या ठुमरी, दादरा आणि हिंडोला या गायन प्रकारातून दिसली. राजश्री पाठक यांनी शब्दप्रधान गायकीचे वैशिष्ट्य उलगडत ‘उमरियां रे सैंय्या’ ही परंपरिक ठुमरी सादर केली. यानंतर शोभा गुर्टू यांनी रचनाबद्ध केलेला ‘सजना मीत पिहरवा, आजा रे आजा रे मित पिहरवा’ हा दादरा, त्यातील शब्दांचे भाव उलगडत प्रभावीपणे सादर केला.
ऋतूंचे वर्णन करणाऱ्या उपशास्त्रीय गायकीतील बारामसा प्रकार सादर करताना विरह आणि श्रृंगाराचा गाभा दर्शविणारी ‘दुपहरिया बितैला बलम’ हा दादरा सुरेल आवाजात सादर केला. साथीदारांमुळे गायकाला अपरिमित आनंद होतो असे सांगून पंडित श्रीकांत देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा देत पाठक यांनी शोभा गुर्टू यांनी सुप्रसिद्ध केलेल्या ‘तुम तो बलमा हो चितचोर’ या दादऱ्याची झलक दर्शविली.
मैफलीची सांगता विदुषी गिरीजा देवी यांनी अजरामर केलेला ‘देखो सावरे के संग गोरी झुलेली हिंडोला’ हा हिंडोला प्रकार सादर करताना जणू रसिकांनाही स्वरांच्या हिंदोळ्यावर झुलविले. पंडित अरविंदकुमार आझाद (तबला), उदय कुलकर्णी (संवादिनी) यांनी साथसंगत केली.
महोत्सवाची सांगता किरणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित डॉ. संजय गरुड यांच्या गायनाने झाली. पंडित गरुड यांनी मैफलीची सुरुवात राग जोगकंसमधील ‘सुघर बर पायो’ या पारंपरिक बंदिशीने केली. द्रुत लयीत ‘पीर पराये जाने ना’ ही रचना सादर केली.
खुला, घुमावदार, तीन सप्तकात फिरत असणारा आवाज, दमदार ताना, रागातील बारकावे उलगडून दाखवत पंडित गरुड यांनी रसिकांची मने जिंकली. त्यानंतर पंडित गरुड यांनी ‘कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे’ हे सुप्रसिद्ध भजन सादर करून भक्तीरसाची निर्मिती केली. त्यांना रसिकांनी टाळ्यांच्या गजरात साथही केली. मैफलीची सांगता ‘जो भजे हरिको सदा’ या भैरवीतील भक्तीरचनेने केली. या रचनेने मैफलीचा कळसाध्याय गाठला.
पंडित संजय गरुड यांच्या रुंजी घालणाऱ्या स्वरांनी रसिकांच्या मनात भक्तीभावाची जागृती झाली. रोहन पंढरपूकर (तबला), तुषार केळकर (संवादिनी), माऊली फाटक (पखवाज), प्रसाद कुलकर्णी, विकास पाटील (तानपुरा, सहगायन), निषाद गरुड (टाळ) यांनी साथसंगत केली.
कलाकारांचा सत्कार काकासाहेब चव्हाण, शिलाताई देशपांडे यांनी केला.
पंडित प्रमोद गायकवाड यांना ब्रह्मनाद पुरस्कार
ह. भ. प. मारुतीराव गरुड स्मृती ब्रह्मनाद पुरस्काराने प्रसिद्ध शहनाईवादक डॉ. पंडित प्रमोद गायकवाड यांचा गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण शिलाताई देशपांडे, काकासाहेब चव्हाण, अनिकेत चव्हाण, ह. भ. प. डॉ. विजय महाराज जगताप, पंडित अरविंदकुमार आझाद, सुभाष चाफळकर, पंडित राजेंद्र कुलकर्णी, पं. राजेंद्र कंदलगावकर, पंडित डॉ. संजय गरुड, रागिणी गरुड यांच्या उपस्थितीत झाले.