गोल्डन आय न्यूज नेटवर्क
अभिजन-बहुजन भेदरेषा पुसल्या जाव्यात : डॉ. श्रीपाल सबनीस !
बाबा भारती प्रतिष्ठान, पुणेतर्फे विविध पुरस्कारांचे वितरण !
पुणे : एकसंघ समाज निर्माण करण्याची संविधानाची भूमिका असतानाही राजकीय व्यवस्था धार्मिक तेढ निर्माण करून जातीपातीचे राजकारण करीत आहेत. परंतु आजच्या काळात अभिजन आणि बहुजन यातील भेदरेषा पुसल्या गेल्या पाहिजेत. एकात्मतेसाठी विचारपातळीवर सर्वांनी समता, शांतता, करुणावादी विचारांचा जागर केला पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली. बाबा भारती यांचा समतेचा व शांततेचा संदेश महेंद्र भारती पुढे नेत आहेत, ही गौरवाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
बाबा भारती प्रतिष्ठान, पुणे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यता पुरस्कारार्थींसमवेत महेंद्र भारती, सुनील वारे, डॉ. श्रीपाल सबनीस, सुनीताराजे पवार, सुदाम भोरे आदी.
पाली-मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि 34व्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ बाबा भारती प्रतिष्ठान, पुणे यांच्यातर्फे विविध पुरस्कारांचे वितरण डॉ. सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार होत्या तर नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती व्यासपीठावर होते.
‘बार्टी’, पुणेचे महासंचालक सुनील वारे यांचा बाबा भारती जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पुणेरी पगडी, उपरणे, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. प्रा. प्रभाकर दाभाडे (नांदेड), सुप्रिया सोळांकुरे (बारामती), मानसी चिटणीस (चिंचवड) यांना बाबा भारती साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तर भगवान जाधव (सांगली) यांचा बाबा भारती धम्मभूषण पुरस्कार आणि संभाजी खैरमोडे (इस्लामपूर) यांचा बाबा भारती समाजभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महापुरुषांना जात, धर्म, देश नसतो असे सांगून डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, महापुरुषांचे विचार आणि शिकवण व्यापक असते. शुद्ध प्रबोधनासाठी मानवातावादी विचार महत्त्वाचा आहे. वारे यांचे कार्य व्यापक आहे त्यात भेदाभेद नाही, अशा शब्दात त्यांनी गौरव केला.
बाबा भारती यांचा साहित्य क्षेत्रातील कार्याचा गौरव करून अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सुनीताराजे पवार म्हणाल्या, पुस्तक हे संस्कृतीचे मस्तक असते आणि ही संस्कृती पिढीनुरूप पुढे जात राहते. बुद्ध आणि शांती हे एकमेकांपासून वेगळे नाही. जेव्हा ज्ञान मारले जाते तेव्हा संस्कृती नष्ट होते.
सत्काराला उत्तर देताना सुनील वारे म्हणाले, पाली भाषेच्या अभ्यासासाठी आयुष्य वेचणारे बाबा भारती हे वंदनीय आहेत. त्यांचे साहित्यक्षेत्रातील योगदान खूप मोलाचे आहे. त्यांच्या साहित्यकृतींचा अभ्यास होऊन त्यातील विचार जनसामन्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
याकरिता पाली भाषा साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.साहित्यकृतींमधून शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या जाव्यात अशी अपेक्षा सुदाम भोरे यांनी व्यक्त केली. पुरस्कारार्थींनी मनोगत व्यक्त केले. त्यांच्याशी पुरुषोत्तम सदाफुले यांनी संवाद साधला.
मान्यवरांचे स्वागत आणि बाबा भारती यांच्या कार्याची माहिती देऊन जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्रात वर्षभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे महेंद्र भारती यांनी सांगितले. सूत्रसंचालन दिगंबर ढोकले यांनी केले तर आभार राजेंद्र वाघ यांनी मानले.
जाहिरात