Marathi FM Radio
Wednesday, May 14, 2025

डॉ. तारा भवाळकर, शरद पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर आधारित ‌‘मु. पो. तालकटोरा‌’ पुस्तकाचे प्रकाशन.!!

Subscribe Button
गोल्डन आय न्यूज नेटवर्क

दिल्लीच्या तख्तावर महाराष्ट्राची पकड घट्ट झालेली पहायला मिळेल : शिवेंद्रराजे भोसले !

डॉ. तारा भवाळकर, शरद पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर आधारित ‌‘मु. पो. तालकटोरा‌’ पुस्तकाचे प्रकाशन !;

99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्याचा मान साताऱ्यास मिळावा : शिवेंद्रराजे भोसले !

पुणे : मराठी भाषेची ओळख कधीच पुसली जाणार नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणे हा एकच ध्यास घेवून महाराष्ट्र साहित्य परिषदेसह सर्वांनी प्रयत्न केले. दिल्लीतील आंदोलन तसेच सतत पाठपुरावा करून या इच्छेला मूर्त स्वरूप मिळाले आहे. दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी केले याचे कौतुक आहे.

Advertisement

महाराष्ट्र आता मागे वळून पाहणार नाही. दिल्ली आता दूर नाही. दिल्लीच्या तख्तावर महाराष्ट्राची पकड घट्ट झालेली पहायला मिळेल, असा विश्वास महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला. 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्याचा मान साताऱ्यास मिळावा, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

Advertisement

Advertisement

‘मु. पो. तालकटोरा‌’ या पुस्तक प्रकाशन प्रसंगी उपस्थित (डावीकडून) शैलेश वाडेकर, श्रीराम पवार, प्रा. मिलिंद जोशी, शिवेंद्रराजे भोसले, संजय नहार, विनोद कुलकर्णी, सुनिताराजे पवार, शैलेश पगारिया.

Advertisement

रहद, पुणे आयोजित 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष शरद पवार आणि उद्घाटक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर आधारित ‌‘मु. पो. तालकटोरा‌’ या पुस्तकाचे प्रकाशन तसेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या मसापच्या कार्यकर्त्यांचा सत्कार मंत्री भोसले यांच्या हस्ते आज (दि. 17) करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisement

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी दिल्ली येथे शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. या निमित्त त्यांचा सन्मान प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. तर कार्यकर्त्यांचा सत्कार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.

सरहद, पुणेचे अध्यक्ष संजय नहार, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, सरहद, पुणेचे संचालक डॉ. शैलेश पगारिया, शैलेश वाडेकर व्यासपीठावर होते.

राजकारण्यांना नेहमीच पत्रकार आणि साहित्यिकांची भीती असते असे सुरुवातीस सांगून शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, माझा साहित्याचा अभ्यास नाही परंतु, आवड नक्कीच आहे. साताऱ्यात साहित्यिक आणि कलाकार यावेत यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो. साहित्य क्षेत्रात साताऱ्यातील मसाप शाखेच्या माध्यमातून विविध उपक्रम घेतले जात आहेत.

सतत कार्यशील असणाऱ्या सातारकरांचा परिषदेवर ठसा उमटला आहे. सत्काराचा संदर्भ देऊन भोसले पुढे म्हणाले, एखाद्या मंत्र्याचे आंदोलक म्हणून स्वागत व सत्कार इतिहासात पहिल्यांदाच झाला असेल. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात मराठी भाषिकांना खुला प्रवेश मिळण्यासाठी तसेच स्पर्धा परिक्षा देणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाची सोय करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.



चौकट :
मी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा आजीव सभासद आहे. परिषदेच्या अनेक उपक्रमात मी सहभागी असतो. परिषदेचे काम प्रा. मिलिंद जोशी, सुनिताराजे पवार, विनोद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली उत्तम सुरू असून आम्ही साहित्य परिषदेच्या बरोबर आहोत.
– शिवेंद्रसिंहराजे भोसले

देशाला विचार-दिशा देणारे राज्य ही ओळख जपली जावी : प्रा. मिलिंद जोशी

अध्यपदावरून बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, उदारमतवाद आणि वैचारिक मोकळेपणा हे महाराष्ट्राची परंपरा आहे. दिल्लीतील साहित्य संमेलनात वैचारिक मोकळेपणाचे दर्शन घडले. विविध विचारधारांची आणि मतांची माणसे व्यासपीठावर होती;

तरीही आपल्या विचारांशी ठाम राहतानाही त्यांच्यातील सौहार्द पाहायला मिळाले. याचीच आजच्या काळात गरज आहे. ते पुढे म्हणाले, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे वैचारिक नेतृत्व करतात अशी लोकभावना आहे. ती दृढ करण्याचे काम संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी आपल्या बाणेदार अध्यक्षीय भाषणातून केले.

मराठी माणसांची मानसिकता हेच त्याच्या समोरचे मोठे आव्हान आहे. संकुचित मनोवृत्ती आणि कोतेपणा हा प्रगतीतला सगळ्यात मोठा अडसर आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी पक्ष, विचारधारा आणि राजकारण दूर ठेवून महत्त्वाच्या प्रश्नांसाठी एकत्र येण्याची मानसिकता आणि राजकीय इच्छाशक्ती निर्माण झाली तरच महाराष्ट्राचे भले होईल. देशाला विचार आणि दिशा देणारे राज्य अशी महाराष्ट्राची ओळख आहे, ती जपली पाहिजे, असे आवाहन प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.

साताऱ्याला साहित्य संमेलनाचा मान मिळावा अशी गेल्या दहा वर्षांपासून मागणी आहे. या मागणीचा साकल्याने विचार केला जाईल, असे प्रा. जोशी म्हणाले. दिल्ली येथील साहित्य संमेलनाविषयी जेव्हा जेव्हा बोलले जाईल त्या त्या वेळी डॉ. भवाळकर, शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यासह संमेलनाचे संयोजक संजय नहार यांचेही नाव आवर्जून घेतले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविकात संजय नहार म्हणाले, दिल्ली म्हणजे पानीपत, दिल्लीचे तख्त मिळवता येणार नाही असा न्यूनगंड मराठीजनांमध्ये निर्माण झाला होता. दिल्लीत मराठी माणसे एकत्र येत नाहीत हा समजही दिल्ली येथे झालेल्या 98व्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून दूर झाला.

मराठी माणूस एकत्र येण्यासाठी दिल्लीतील महाराष्ट्र सदन दिल्लीतील मराठी जनांसाठी खुले करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राची दिल्लीतील पत वाढविण्यासाठी पुन्हा एकदा भोसले यांच्याबरोबर शिंदे आले तर हे शक्य होईल. तसेच पवार-शिंदे-भोसले एकत्र आल्याशिवाय महाराष्ट्राचे नाव दिल्लीत गुंजणार नाही.

पुस्तकाविषयी बोलताना श्रीराम पवार म्हणाले, या पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्र धर्म काय आहे, तो काय सांगतो आणि भारताला तो काय देऊ इच्छितो याविषयी डॉ. तारा भवाळकर, शरद पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार प्रकट झाले आहेत.

राज्याची अस्मिता मातृभाषेशी जोडली जाते, राज्यकर्ते म्हणून भाषिक अस्मितेची भावना समजून घ्यावी, संमेलनाच्या मांडवात राजकारणी यावेत का, संमेलनाचा पोत राजकारण्यांमुळे बिघडतो का तसेच उत्तर आणि दक्षिणेचा संयोग असलेली महाराष्ट्राची समन्वयवादी संस्कृती, लोकसाहित्याचे मूल्य अशा विविध विषयांवर गंभीर चिंतन, मंथन, संचित या पुस्तकाद्वारे समाजापुढे येत आहे, हे नुसतेच दस्तावेजीकरण नव्हे तर या पुस्तकातून ठाम विचार पुढे येत आहेत.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विनोद कुलकर्णी यांनी परिचय करून दिला. महाराष्ट्राच्या इतिहासाची उजळणी होताना छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य वगळून पुढे जाता येणार नाही, असे ते म्हणाले.

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular