गोल्डन आय न्यूज नेटवर्क
संविधानाला अभिप्रेत धर्मनिरपेक्ष रमाई महोत्सव : डॉ. श्रीपाल सबनीस !
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकतर्फे आयोजित रमाई महोत्सवाचे उद्घाटन !
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी तर महामाता रमाई यांनी बाबासाहेबांसाठी आयुष्य समर्पित केले. महामाता रमाई यांचा त्याग मोलाचा आहे. महामाता रमाई महोत्सव ऐक्याची भूमिका मांडणारा, माणुसकीला प्रोत्साहन देणारा, संविधानाला अभिप्रेत असलेला धर्मनिरपेक्ष महोत्सव आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महामाता रमाई महोत्सवाचे आणि रमाई ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन डॉ. सबनीस यांच्या हस्ते आज (दि. 1) सायंकाळी झाले. त्या वेळी ते बोलत होते. दि. 7 फेब्रुवारी 2025 पर्यंत महामाता रमाई महोत्सव सायंकाळी 6 ते 8 या वेळात रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, वाडिया कॉलेज समोर येथे होणार आहे.
महोत्सवाचे उद्घाटन महामाता रमाई याच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच भारतीय संविधनाच्या प्रिॲम्बलचे सामूहिक वाचन करून आणि बोधी वृक्षास पाणी घालून करण्यात आले. महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, लता राजगुरू, प्रा. रतनलाल सोनग्रा, ॲड. जयदेव गायकवाड, मैथिली आडकर, ॲड. अविनाश साळवे, यशवंत नडगम, बापू वागसकर मंचावर होते.
रमाई महोत्सवाचे उद्घाटन रोपट्याला पाणी घालून करताना लता राजगुरू, मैथिली आडकर, ॲड. प्रमोद आडकर, डॉ. श्रीपाल सबनीस, विठ्ठल गायकवाड, यशवंत नडगम.
डॉ. सबनीस पुढे म्हणाले, रमामाई महोत्सव आंबेडकर चळवळीचा नाही तर मानवतेचा महोत्सव आहे. सर्व जाती-धर्माचे लोक रमाईला वंदन करतात. धर्माच्या चौकटीबाहेरचा हा महोत्सव आहे. समाजातील एकात्मता हरवून बसलेली असताना रमाई महोत्सव शुद्ध प्रबोधन करणारा आणि लोकशाही टिकविणारा आहे. रमाई महोत्सवानिमित्त ग्रंथ महोत्सव सुरू केल्याबद्दल डॉ. सबनीस यांनी विठ्ठल गायकवाड आणि ॲड. प्रमोद आडकर यांचे कौतुक केले.
स्वागतपर प्रास्ताविकात महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. जात-पात न मानता रमाई महोत्सवाचे आयोजन केले जाते, असे ते म्हणाले.
ॲड. जयदेव गायकवाड, प्रा. रतनलाल सोनग्रा, ॲड. अविनाश साळवे यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांचा सत्कार लता राजगुरू यांनी केला तर सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले.