गोल्डन आय न्यूज नेटवर्क
गीत आणि काव्यातून उलगडले सर्जनशील रानकवी ना. धों. महानोर !
‘कवी शब्दांचे ईश्वर’ कार्यक्रमातील सादरीकरणाला रसिकांची अंत:करणपूर्वक दाद .
पुणे : रान आणि शेतीला काव्याचा केंद्रबिंदू मानून आपले काळीज रानाला बहाल केलेले सर्जनशील कवी ना. धेों महानोर त्यांच्याच गीत आणि काव्यातून रसिकांसमोर आज नव्याने उलगडले.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रानकवी ना. धों. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गायन आणि काव्य वाचनावर आधारित ‘कवी शब्दांचे ईश्वर’ या कार्यक्रमाचे आयोजन आज (दि. 12) पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले होते.
गीत, काव्य आणि अभिवाचन याचा सुरेख संगम साधत ना. धों. महानोर यांच्या काव्यांचे विविध पैलू कलावंतांनी उलगडून दाखविले. आर्या कम्युनिकेशन अँड व्हिडीओज प्रस्तुत आणि मनिषा निश्चल यांच्या महेकतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पुण्यातील पहिल्याच प्रयोगाला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रानकवी ना. धों. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात सहभागी (डावीकडून) सक्षम कुलकर्णी, डॉ. माधवी वैद्य, अक्षय वाटवे, राहुल घोरपडे, डॉ. राधा मंगेशकर आणि मनिषा निश्चल.
‘मी रात टाकली’, ‘चांद केवड्याची रात’, ‘किती जीवाला राखायचं’, ‘चिंब पावसाने’, ‘घन ओथंबून येती’, ‘असं एखाद पाखरू वेल्हाळ’, ‘आम्ही ठाकर ठाकर’, ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’, ‘लिंगोबाचा डोंगूर’, ‘राजसा जवळी जरा बसा’, ‘बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीत गं’ या लोकप्रिय गीतांनी रसिकांना भुरळ घातली.
मराठीच्या प्रांगणात गार वाऱ्याची झुळुक असणारा, हिरव्या बोलीची मादकता दर्शविणारा रानकवी ज्याने बिनचेहऱ्याचा काल्पनिक निसर्ग नाही तर प्रत्यक्ष निसर्गातील हिरवाई अनुभवली, ज्याच्याशी निसर्ग बोलत असे याचे शब्दचित्र ‘दूरच्या रानात’, ‘गडद जांभळं’, ‘ग्रीष्माचं उन एकदा खेड्यावर आलं’, ‘राघू उठून जाताना’, ‘बोंडा बोंडात कपाशी वेचताना’, ‘दिवे लागणीची वेळ’, ‘एक पाय शेणाचा एक पाय मेणाचा’, वाडीवरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी’ या काव्यातून निसर्ग आणि मानवी भावभावनांच्या छटांमधील अनुबंध रसिकांनी अनुभवले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माजी कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांच्या कसदार लेखणीतून संहिता आकारास आली तर डॉ. राधा मंगेशकर आणि मनिषा निश्चल यांनी सुरेल आवाजात मराठी चित्रपट गीते सादर केली. ‘अनन्वय’ या संस्थेचे यशस्वी कलाकार राहुल घोरपडे, सक्षम कुलकर्णी, अक्षय वाटवे आणि डॉ. माधवी वैद्य यांनी आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत काव्यवाचनाद्वारे कार्यक्रमाची उंची वाढविली.
अमृता ठाकुरदेसाई, प्रणव कुलकर्णी, विशाल गंड्रतवार, अभय इंगळे यांनी तितकीच सुरेल साथसंगत केली.ते शब्दरूपाने रसिकांच्या मनावर राज्य करतील..या कार्यक्रमाला ना. धों. महानोर यांच्या कनिष्ठ कन्या सरला महानोर-शिंदे आणि कुटुंबिय उपस्थित होते. वडिलांच्या आठवणी सांगताना महानोर-शिंदे म्हणाल्या, वडिलांनी आयुष्यात खूप कष्ट भोगले.
कुटुंबात साहित्य, संगीत याचा काहीही संबंध नव्हता; परंतु आजी निरक्षर असूनही त्यांनी वडिलांना शिकवण्याची जिद्द बाळगली. वडिलांच्या काव्यातून स्त्रीचे दु:ख प्रकट होत असे, ज्या माझ्या आईच्या भावना असायच्या. ते शब्दरूपानेच रसिकांच्या मनावर कायम राज्य करतील. महानोर आणि मंगेशकर कुटुंबियांचे स्नेह कसे जुळून आले याविषयी त्यांनी आठवणी जागविल्या.
जाहिरात