संगीत संशय कल्लोळ नाटकावर आजही पसंतीची मोहोर : श्रीनिवास भणगे ,
भरत नाट्य संशोधन मंदिर आयोजित वासंतिक नाट्य महोत्सव !
पुणे : संगीत संशय कल्लोळ हे नाटक 1916 साली रंगभूमीर पहिल्यांदा आले.
हे नाटक परदेशी कथाबिजावर आधारित असले तरी नाटकातील पुरुष पात्रांची नावे मराठी महिन्यांवर तर स्त्री पात्रांची नावे नक्षत्रांच्या नावानुसार आहेत. त्यामुळे या नाटकाचे मूळ परकीय आहे, असे अजिबात वाटत नाही.
आज सुद्धा या नाटकाला पसंती मिळते हे या नाटकाचे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार श्रीनिवास भणगे यांनी केले.
भरत नाट्य संशोधन मंदित आयोजित 31व्या वासंतिक संगीत नाट्यमहोत्सवात आज गो. ब. देवल लिखित संगीत संशोय कल्लोळ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता.
प्रयोगाचा शुभारंभ भणगे यांच्या उपस्थित झाला. त्या वेळी ते बोलत होते. भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, विश्वस्त रवींद्र खरे, कार्याध्यक्ष अभय जबडे उपस्थित होते. प्रास्ताविक रवींद्र खरे यांनी तर स्वागत पांडुरंग मुखडे यांनी केले.
भणगे पुढे म्हणाले, या नाटकात सुरुवातीस बालगंधर्व आणि त्या नंतर छोटा गंधर्व यांनी भूमिका केल्या होत्या. दोन्ही गंधर्वांचे वैशिष्ट्य असे की या नाटकात प्रथम स्त्री भूमिका केल्या नंतर त्यातील पुरुष भूमिका साकारल्या होत्या.
या नाटकात संजय डोळे, अभय जबडे, चारुदत्त आफळे, रवींद्र खरे, भक्ती पागे, भाग्यश्री देसाई, अपर्णा पेंडसे, सई ओगले, अनुराधा म्हात्रे यांच्या भूमिका आहेत. दिग्दर्शन रवींद्र खरे यांचे आहे. राहुल गोळे (ऑर्गन), प्रसाद करंबेळकर (तबला) यांनी साथसंगत केली.
वासंतिक नाट्य महोत्सवात दि. 13 रोजी पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित संगीत कट्यार काळजात घुसली तर दि. 14 रोजी स्वर सम्राज्ञी या नाटकांचे प्रयोग होणार आहेत.
जाहिरात
जाहिरात