गोल्डन आय न्युज नेटवर्क
वृक्षांनाही भावना असतात हो..!
वृक्ष लागवड, संवर्धन करणाऱ्या रघुनाथ ढोले यांचा रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सन्मान !!
पुणे : एक झाड जगले तर ते मानवाला लाखोंची समृद्धी देते; पण निसर्गाचे शोषण करून मिळविलेल्या समृद्धीचा मानवाला काहीही उपयोग होत नाही, असे प्रतिपादन निसर्गप्रेमी, वृक्षमित्र, देवराई फाउंडेशनचे विश्वस्त रघुनाथ ढोले यांनी केले. ‘वृक्षांनाही भावना असतात हो..’ अशी कृतज्ञताही त्यांनी निसर्गाविषयी व्यक्त केली.
स्वेच्छानिवृत्तीनंतर 38 वर्षांपासून स्वखर्चातून वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन करणारे रघुनाथ ढोले यांचा रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे गुरुवारी (दि. 23) ज्येष्ठ विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. त्या वेळी ढोले सत्काराला उत्तर देताना बोलत होते. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर, प्रज्ञा महाजन व्यासपीठावर होते. प्रसिद्ध गझलकार भूषण कटककर यांची विशेष उपस्थिती होती. शाल, श्रीफळ आणि मानपत्र देऊन ढोले यांचा गौरव करण्यात आला.
रंगत-संगत प्रतिष्ठान आयोजित सन्मान सोहळ्यात (डावीकडून) मैथिली आडकर, ॲड. प्रमोद आडकर, रघुनाथ ढोले, डॉ. सदानंद मोरे, प्रज्ञा महाजन.
झाडांच्या संवर्धनातून निसर्गातील प्राणी, पक्षी, किडे, मुंगी अशा प्रत्येक घटकाचे जीवनचक्र योग्य तऱ्हेने चालत राहते आणि निसर्गातील ढळलेला समतोल साधण्यास त्याची मदत होते, असे सांगून ढोले म्हणाले, लहानपणापासूनच खेड्यात आयुष्य गेल्याने मानवाच्या जगण्याकरिता निसर्गाची किती आवश्यकता आहे याचे भान आले. त्यातूनच जास्तीत जास्त झाडे लावण्याचा संकल्प केला. मनाची उभारी आणि अनेकांचा सहभाग यातून या संकल्पनेला पाठबळ मिळाले आणि आज मितीला 29 लाख रोपे रुजविण्याचे कार्य माझ्या हातून घडले.
यात 300 देवराईंची निर्मिती देखील झाली आहे.
निसर्गाशी असलेले नाते मानव विसरला : डॉ. सदानंद मोरे
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, ढोले यांना दिलेला पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. त्यांचा सन्मान ही आपली गरज आहे. सृष्टीच्या निर्मितीनंतर निसर्गामध्ये योग्य तो समतोल होता. मानव हा निसर्गाचाच एक भाग आहे, तो वेगळा नाही.
परंतु मानव आपल्याला निसर्गापेक्षा वेगळे समजू लागला आणि सुधारणा-विकासाच्या नावाखाली त्याने निसर्गाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास केला. निसर्गाचे व मानवाचे एक नाते आहे हेही तो विसरला. प्रत्येक घटकाच्या सहभागामुळे सृष्टी जीवंत आहे, पण मानवाने आपल्या चुकीच्या कृतीमुळे जीवनचक्र पूर्णत: विस्कळीत केले आहे. संस्कृतीचा पाया म्हणजेच प्रकृती-निसर्ग होय. संस्कृतीच्या पायावर प्रकृती धारण होत असते. परंतु पायाच्या क्षमतेबाहेर संस्कृती वाढू लागली की, तीचा तोल ढासळतो.
आजच्या काळात झाड तोडणे या कृतीला अक्षम्य गुन्हा मानून कडक शिक्षा होणे आवश्यक आहे. तसेच वृक्ष संवर्धकाचा मात्र गौरव होणेही गरजेचे आहे. झाडे वाचविणे, जगविणे हे निसर्गावर मानवाने केलेले उपकार नसून त्याच्या स्वत:च्या जगण्यासाठीची ती गरज आहे. रंगत-संगत प्रतिष्ठानच्या माध्यमातून असे सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना हेरून गौरव केला जातो ही बाब अभिनंदनीय आहे.
भूषण कटककर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथींचा सत्कार आणि प्रास्ताविक ॲड. प्रमोद आडकर यांनी केले. सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांचे होते.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘झाड’ या विषयावर निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते.
जाहिरात