गोल्डन आय न्यूज नेटवर्क
मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांचा महाराष्ट्र धर्म मराठीजनांनी आचारणात आणावा : प्रा. मिलिंद जोशी
मिलिंद सबनीस लिखित ‘वंदे मास्तरम्’ पुस्तकाचे प्रकाशन : मास्तर कृष्णराव गुणगौरव पुरस्काराने सन्मान !!
पुणे : वंदे मातरम् हे केवळ गीत नाही तर तो स्फूर्ती मंत्र आहे. स्वातंत्र्य संग्रामाची प्रज्वलित झालेली ज्योत अधिक तेजस्वी करण्याचे काम या स्फूर्ती मंत्राने केले. ताठ कण्याची मराठी माणसे दिल्लीत गेली की वाकतात असे दिसून आले आहे, परंतु आपल्या करारी बाण्यातून एका महाराष्ट्रीय निस्पृह, राष्ट्रभक्त कलावंताचे सत्व काय असते हे मास्तरांनी वंदे मातरम्साठी दिलेल्या सांगीतिक लढ्यातून दाखवून दिले.
मास्तरांचा हा महाराष्ट्र धर्म मराठीजनांनी आचरणात आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.
वंदे मातरम् हे गीत स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत व्हावे म्हणून संगीतकलानिधी मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी निर्भिडपणे दिलेल्या लढ्याला 74 वर्षे पूर्ण होत आहेत. याचे निमित्त साधून मास्तर फुलंब्रीकर यांनी दिलेल्या लढ्याचे विस्तृत कथा वर्णन करणाऱ्या मिलिंद सबनीस लिखित आणि बिल्वबिभास प्रकाशित ‘वन्दे मास्तरम्’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज (दि. 24) आयोजित करण्यात आला होता.
वंदे मास्तरम्’ पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी उपस्थित (डावीकडून) पंडित अतुलकुमार उपाध्ये, सुनील देवधर, प्रा. मिलिंद जोशी, मिलिंद सबनीस, प्रिया फुलंब्रीकर.
त्या वेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. जोशी बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर उपस्थित होते. याच कार्यक्रमात मिलिंद सबनीस यांचा मास्तर कृष्णराव गुणगौरव पुरस्कार देऊन पंडित उपाध्ये यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 25 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
प्रा. जोशी पुढे म्हणाले, वंदे मातरम् या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी स्वकियांविरोधात केलेल्या सांगीतिक लढ्याची कहाणी या पुस्तकात आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे या गीताला राष्ट्रीय गीताचा दर्जा मिळाला. त्यांच्या या संघर्ष गाथेची इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद व्हायला हवी.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना पंडित अतुलकुमार उपाध्ये मास्तर फुलंब्रीकर यांच्याविषयी म्हणाले, मास्तरांना मैफलीचा बादशहा समजले जात असे. त्यांच्या गाण्यात जीवंतपणा होता, तो आजच्या कलाकारांमध्ये दिसत नाही. ते उत्युच्च प्रतिभावान गायक व संगीत दिग्दर्शक होते.
नवीन पिढीने त्यांच्या गायनाचा अभ्यास करावा अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.
सुनील देवधर म्हणाले, वंदे मातरम् हे राष्ट्रगीत नाही परंतु राष्ट्रगान होऊ शकले यांचे संपूर्ण श्रेय मास्तर फुलंब्रीकर यांना जाते. ‘वंदे मास्तरम्’ या पुस्तकाचे इंग्रजी, हिंदीतही भाषांतर व्हावे, ज्यायोगे वंदे मातरम् राष्ट्रगान होऊ शकले या मागील इतिहास संपूर्ण देशातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचेल. अशा स्वरूपाच्या पुस्तकाचा प्रचार करणे हे सुद्धा राष्ट्रकार्यच आहे, असेही ते म्हणाले.
मास्तर कृष्णराव गुणगौरव पुरस्कार वितरण प्रसंगी (डावीकडून) पंडित अतुलकुमार उपाध्ये, मिलिंद सबनीस, सुनील देवधर, प्रा. मिलिंद जोशी, प्रिया फुलंब्रीकर.
पुरस्काराला उत्तर देताना मिलिंद सबनीस म्हणाले, वंदे मातरम्मुळेच मला या पुरस्काराचा मान मिळाला आहे, असा आदरभाव व्यक्त करीत पुस्तकाच्या लिखाणामागील भावना विशद केल्या. एक संगीत साधक कशा पद्धतीने राष्ट्रभक्ती करू शकतो याचे समग्र दर्शन घडविणारे हे पुस्तक ऐतिहासिक दस्तावेज म्हणून संग्रही ठेवता येईल.
पुस्तक प्रकाशनामागील भूमिका प्रिया फुलंब्रीकर यांनी व्यक्त केली. मान्यवरांचा सत्कार ब्रिगेडिअर विवेक छत्रे (निवृत्त), मंजुश्री छत्रे, वसुंधरा फुलंब्रीकर यांनी केला. सूत्रसंचालन माधुरी जोशी यांनी केले.
.. त्यांचे राजकारण अधिक कुटील
कलावंत हे नेहमी आपल्या कलेच्या क्षेत्रात मशगुल असतात. त्याच्या पलिकेडे जाऊन राजकारण हा आपला प्रांत नाही असे समजत असतात. तेव्हाच आपल्या कलेच्या प्रांतात उदंड राजकारण करत असतात, मात्र त्या राजकारणाची कधी चर्चा होत नाही. कलावंतांचे आणि बुद्धिवंतांचे राजकारण हे खऱ्या राजकारण्यांपेक्षाही अधिक कुटील असते, अशी टिप्पणी प्रा. मिलिंद जोशी यांनी सध्याच्या कलाप्रांताविषयी केली.
———————————–—————————-
जाहिरात