गोल्डन आय न्यूज नेटवर्क
आसवांनी मी मला भिजवू कशाला…?
‘स्पंदने मनाची’ : अन्वर कुरेशी यांचे मराठी गझल गायन !!
पुणे : माणसांचा स्वभावधर्म दर्शविणाऱ्या आणि शब्दा-शब्दांतून वेदना मांडणाऱ्या मराठी गझलांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.
निमित्त होते स्वरसंगत फाऊंडेशन आयोजित ‘स्पंदने मनाची’ या मराठी गझल गायन कार्यक्रमाचे! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे निमित्त साधून उस्ताद अन्वर कुरेशी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. एस. एम. जोशी सभागृहात ही शब्दमैफल रंगली. उस्ताद अन्वर कुरेशी आणि त्यांच्या शिष्यांनी सुरेल आणि भावपूर्ण पद्धतीने गझलांचे सादरीकरण केले. कवी, गझलकार सुरेश भट, रमण रणदिवे, इलाही इनामदार, दीपक करंदीकर, प्राचार्य सतीश देवपूरकर यांच्या गझल उस्ताद अन्वर कुरेशी यांनी प्रामुख्याने सादर केल्या.
मराठी गझल या लोकप्रिय काव्य प्रकारात अनेक गझलकारांनी प्रेम, दु:ख, निराशा, आशा आणि सामाजिक विषयांवर प्रभावी शब्दांद्वारे व्यक्त होत रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला आहे. संगीतकार, उस्ताद अन्वर कुरेशी यांनी मराठीतील काही प्रसिद्ध गझलांना स्वत: चाली लावून त्याचे सादरीकरण या कार्यक्रमात केले. त्यास रसिकांनी उस्फूर्तपणे दाद देत मैफलीचा आनंद घेतला.
कुरेशी यांनी मैफलीची सुरुवात सुरेश भट यांच्या ‘हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही’ या गझलेच्या सादरीकरणाने केली. ‘पुन्हा तेजाब दु:खाचे उरी फेसाळुनी गेले’, ‘माणसांना टाळणारी माणसे मी पाहिली’, ‘काळजाला सारखा जाळीत गेलो मी तिला भेटायचे टाळीत गेलो’, ‘एकटी एकांत समयी’, ‘सारेच हे उमाळे आधीच योजलेले’, ‘काळजाला माझीया’, ‘तू चोर पावलांनी येऊ नकोस आता’, ‘भाबड्या मनाला माझ्या’ या आणि इतर काही भावस्पर्शी गझल उस्ताद अन्वर कुरेशी आणि त्यांचे शिष्य हेमा सावंत, मीना जोगळेकर, बाळासाहेब सावंत यांनी सादर केल्या.‘आसवांनी मी मला भिजवू कशाला?’
ही भैरवीत संगीतबद्ध केलेली रचना सादर करून कुरेशी यांनी मैफलीची सांगता केली. शंकर कुचेकर (तबला), प्रमोद जांभेकर (व्हायोलिन), सुधीर टेकाळे (की-बोर्ड), मानस गोसावी (इसराज) यांनी साथंसगत केली तर रवी चाबके यांचे निवेदन होते.
पंचाहत्तरीत पदार्पण केल्यानिमित्ताने रमण रणदिवे आणि प्रमोद जांभेकर यांचा सत्कार ज्येष्ठ व्हायोलिन वादक उस्ताद फैयाज हुसेन खान यांच्या हस्ते करण्यात आला. कृतज्ञतेने सत्काराचा स्वीकार करतो असे सांगून गझल गाणारे खूप आहेत पण शब्दांचा भाव समजून सादरीकरण करणारे कमी आहेत. त्या पैकी एक म्हणजे अन्वर कुरेशी होय अशा शब्दांत रमण रणदिवे यांनी त्यांचे कौतुक केले.