गोल्डन आय न्यूज नेटवर्क
महाराष्ट्राविषयी काश्मिरी युवक कृतज्ञ
महाराष्ट्रात घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग काश्मिरी जनतेसाठी करणार
पुणे : सरहद, पुणेच्या माध्यमातून काश्मीरमधील अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्रात मुख्यत्वे करून पुण्यात राहात आहेत. महाराष्ट्रातील जनतेशी आमचे स्नेहबंध जोडले गेले आहेत. महाराष्ट्राविषयी आम्हाला आपुलकी आहे. महाराष्ट्रातून काश्मीरमध्ये परतलेल्या विद्यार्थ्यांनी पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे अडकलेल्या मराठी पर्यटकांना मानसिक आधार देत त्यांची काळजी घेतली.
महाराष्ट्रात शिकलेला काश्मिरी युवकवर्ग आपल्या ज्ञानाचा उपयोग काश्मीरमधील विद्यार्थ्यांसाठी करू इच्छित आहे. ज्या योगे त्यांना काश्मीर पलिकडील भारताची मुख्यत्वे करून महाराष्ट्राची माहिती होईल. त्यांना प्रमुख प्रवाहाशी जोडण्याची चळवळ उभी केली जाईल. दहशवादी हल्ल्यानंतर या युवकांमध्ये अस्वस्थता आहे.
भारतातील काही ठिकाणी काश्मीरमधून शिकायला गेलेल्या विद्यार्थ्यांवर हल्ले झाले आहेत या पार्श्वभूमीवर आज (दि. 27) काश्मीरमधील पुण्यात शिकलेल्या विद्यार्थ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
अर्हम संस्थेचे प्रमुख डॉ. शैलेश पगारिया, सरहद, पुणेचे समन्वयक लेशपाल जवळगे तसेच अकीब भट (आरागाम), मंझूर बशीर (बांदिपोरा) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी महम्मद शफी (बडगाम), गुलशन काद्री, दिलबर खोजा (कुपवाडा), मारिया गुलजार (गंदेरबल), असिफ डर हे काश्मिरी युवक उपस्थित होते. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्याचा निषेध करीत मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहून काश्मिरी युवकांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली.
पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देशाच्या विविध भागात शिक्षण-व्यवसायानिमित्त असलेल्या काश्मिरी तरुणांना धमकावले गेल्याच्या घटना घडल्या आहेत. पुण्यातही असे किरकोळ प्रकार झाल्यानंतर उद्या (दि. 28) पोलीस आयुक्तांची भेट घेऊन परिस्थितीविषयी अवगत केले जाणार आहे. मात्र आमची कोणाविरुद्ध तक्रार नाही. पोलिसांनी आम्हाला सदैव मदत केली आहे.
त्या बद्दल त्यांचे आभारही मानणार आहे, अशी माहिती देऊन अकीब भट म्हणाले, सरहद संस्थेशी आम्ही जोडले गेलो असून याच माध्यमातून पुण्यातून शिक्षण घेऊन परत काश्मीरमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांनी दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांची काळजी घेतली. या मागचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील जनता आणि काश्मिरी युवक यांच्यात भावबंध जुळलेले आहेत.
पुण्यात घेतलेल्या शिक्षणाचा वसा आम्हाला काश्मीरमधील पुढच्या पिढीकडे पोहोचवायची इच्छा आहे. मंझूर बशीर म्हणाले, महाराष्ट्रातील वास्तव्यामुळे मला मराठी भाषा समजते आणि बोलताही येते. मी काही मराठी चित्रपटांमध्येही काम केले असून नृत्य दिग्दर्शनही करत आहे.
यातून माझा पुण्या-मुंबईतील मराठी माणसांशी स्नेहबंध जुळला आहे. सरहद, पुणेच्या माध्यमातून मला मिळालेल्या शिक्षणाने माझ्यातील आत्मविश्वास व सकारात्मकता वाढीस लागली आहे. मी स्वत: काश्मीरमधील दहशतवादाने पिडीत आहे. आम काश्मिरी जनता दहशतवाद्यांचा नेहमीच विरोध करत आली आहे. काश्मीरमधील पर्यटन बंद पाडून तेथील आर्थिक व्यवहार ठप्प होणे आम्हाला योग्य वाटत नाही.
तसेच आम्ही घेतलेले शिक्षण सरदह संस्थेच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमधील आमच्या मूळ गावातील विद्यार्थ्यांना देऊन त्यांनाही आत्मविश्वासू व स्वयंपूर्ण बनविण्याचा आमचा मानस आहे. या करीता काश्मीर व महाराष्ट्रातील एकात्मता, प्रेम, जिव्हाळा अखंडित रहावा, अशी आम्हा काश्मिरी युवकांची इच्छा आहे. महाराष्ट्रातून काश्मीरला येणाऱ्या पर्यटकांसाठी महाराष्ट्र दूत म्हणून आम्ही काम करणार आहोत.