गोल्डन आय न्यूज नेटवर्क
आदिवासी चित्रपटांमध्ये आत्म्याच्या अभाव : श्रीनिवास भणगे
बहुरंग, पुणेतर्फे ‘आदिवासी सिनेमावर बोलू काही..’ विषयावर रंगला परिसंवाद
पुणे : आदिवासी चित्रपटांच्या माध्यमातून केलेली मांडणी ही सत्यावर आधारित नसते. तर त्याला काल्पनिकतेची जोड देऊन कलात्मक निर्मितवर भर दिला जातो. विषयाच्या खोलवर जाऊन प्रामाणिकतेने चित्रपट घडविणे आवश्यक आहे. चित्रपटाच्या दिमाखात सत्य, मूळ कथा मारली जाते.
त्याचा आत्मा विसरला जातो, अशी गंभीर टिप्पणी नाट्य-चित्रपट पटकथा लेखक व अभ्यासक श्रीनिवास भणगे यांनी केली. ‘जैत रे जैत’ हा चित्रपट खरोखरच आदिवासींच्या रुढी, परंपरा दर्शविणारा आहे का, असा प्रश्न प्रेक्षकांना कधी पडला आहे का असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
बहुरंग, पुणेतर्फे पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या ‘आदिवासी सिनेमावर बोलू काही..’ या विषयावरील विशेष परिसंवादात श्रीनिवास भणगे अध्यक्षपदावरून बोलत होते. पंडीत जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे आज (दि. २२) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार राज काझी, नाट्य-चित्रपट परिक्षक उमेश घळसासी, सिनेमॅटोग्राफर स्वप्ना पाटसकर, हेमंत भागवत, सिने अभिनेत्री पल्लवी कदम यांचा यांचा सहभाग होता. बहुरंग, पुणेचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक केदारी मंचावर होते. गायक दयानंद घोटकर यांचा या वेळी बहुरंग पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
श्रीनिवास भणगे पुढे म्हणाले, प्रेक्षकांना आदिवासी समाजाविषयी आत्मियता असल्यास त्या समाजाचा आत्मा, चालिरिती, रूढी-परंपरा दर्शविणारा चित्रपट नक्कीच भावेल. साहित्यकृती, चित्रपट, नाट्यकृती या सर्वांना एक आत्मा आहे, त्याचा शोध घेणे आवश्यक आहे. प्रेक्षक म्हणून आपण आपल्याला काय बघायचे आहे, याविषयी बोलत नाही तर जे दाखविले जाते त्यातील काय आवडले एवढेच बघतो.
राज काझी म्हणाले, आदिवासी चित्रपटांच्या माध्यमातून विपरित, विकृत अडाणीपणाचे जीवनचित्रण दाखविले जात आहे. मूळ निवासी त्यांच्या जाणीवा, समस्या, अस्तित्वाची लढाई, रूढी-परंपरा हे विषय चित्रपटासाठी महत्त्वाचे आहेत. परंतु कथेच्या गाभ्यामधून हे मूलभूत विषय गांभीर्याने मांडले जात नाहीत.
उमेश घळसासी यांनी स्थानिक पातळीपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण होणाऱ्या आदिवासी चित्रपटांविषयी धांडोळा घेतला. आदिवासी चित्रपट निर्मितीची चळवळ माहितीपट व लघुपट यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून पुढे जावी ज्यायोगे आजवर न दर्शविलेल्या आदिवासी परंपरा, त्यांची निसर्गाशी असलेली बांधिलकी असे विषय समोर येतील.
हेमंत भागवत म्हणाले, आदिवासी चित्रपट निर्मित होताना आदिवासींचा संघर्ष, आत्मशोध, अस्मिता, परंपरा या विषयी विचार व्हायला हवा. आदिवासी चित्रपटांच्या माध्यमातून निसर्ग फक्त पार्श्वभूमी म्हणून नाही तर पात्र म्हणून समोर येणे आवश्यक आहे.
स्वप्ना पाटसकर यांनी आदिवासी जमातीवर लघुपट व माहितीपटांचे चित्रीकरण करताना आदिवासी समाजातील चालीरिती, रूढी-परंपरा, निसर्गाविषयीचे ज्ञान यांचे जवळून दर्शन झाल्याचे सांगितले. आजचा आदिवासी युवावर्ग विकास साधताना आपल्या मूळ रूढी-परंपरांपासून दूर जात असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले.
पल्लवी कदम म्हणाल्या, आदिवासी चित्रपटांच्या माध्यमातून लोकपरंपरा, लोकगीते यांच्या मांडणी व्यतिरिक्त या समाजातील पुढारलेले विचार, सामाजिक स्थित्यंतरे, काळानुरूप होणारे बदल यांची बारकाईने मांडणी होणे आवश्यक आहे. प्रेक्षक म्हणून आपण त्यांचा स्वीकार करणे गरजचे आहे.
डॉ. कुंडलिक केदारी यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी माहिती सांगताना चित्रपटातील बटबटीतपणाला वेळीच आवर घालावा, त्या अनुषंगाने चर्चा घडावी या उद्देशाने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण देशमुख यांनी केले तर आभार विश्वास रांजणे यांनी मानले.