गोल्डन आय न्यूज नेटवर्क
संत चोखामेळा यांस पांडुरंगाने नव्हे तर तत्कालिन समाजव्यवस्थेने अव्हेरले : ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे प्रतिपादन !
संत चोखामेळा अध्यासन केंद्र व वृंदावन फाऊंडेशन आयोजित पहिल्या संत चोखामेळा साहित्य संमेलनाचे आळंदीत उद्घघाटन !
आळंदी (पुणे) : संत चोखामेळा यांना पांडुरंगाने कधीही अव्हेरले नाही तर त्या काळातील समाजव्यवस्थेमुळे संत चोखामेळा पांडुरंगाच्या चरणी पोहोचू शकले नाहीत, असे स्पष्टीकरण पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिले.
संत चोखामेळा यांचे कार्य प्रदीर्घ काळ दुर्लक्षित राहिले याचा खेद असला तरी आज त्यांच्या नावे होत असलेल्या या पहिल्या संत चोखामेळा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा मान मिळाला याचा आनंद आहे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
दीप प्रज्वलन करताना उपस्थित ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर, प्राचार्य डॉ. अप्पासाहेब पुजारी, ह. भ. प. माणिकबुवा मोरे महाराज, ह. भ. प. माधव महाराज नामदास, ह. भ. प. प्रा. पुरुषोत्तम महाराज मोरे देहूकर, प्रा. उल्का चंदनशिवे, सचिन पाटील आदी.
संत चोखामेळा अध्यासन केंद्र आणि वृदांवन फाऊंडेशनतर्फे आळंदी (पुणे) येथे दोन दिवसीय पहिल्या संत चोखामेळा साहित्य संमेनलाचे आयोजन एम. आय. टी. महविद्यालयात करण्यात आले आहे. संमेलनस्थळाचे नामकरण श्री संत नामदेव महाराज साहित्यनगरी असे करण्यात आले आहे.
उद्घाटन सोहळा श्री संत ज्ञानेश्वर महाराज व्यासपीठावर आयोजित करण्यात आला होता. संमेलनाचे उद्घाटन ह. भ. प. औसेकर महाराज यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. संमेलनाचे अध्यक्ष, प्राचार्य डॉ. अप्पासाहेब पुजारी, संमेलनाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष, संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह. भ. प. माणिकबुवा मोरे महाराज, स्वागताध्यक्ष ह. भ. प. माधव महाराज नामदास, जगत्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान अध्यक्ष ह. भ. प. प्रा. पुरुषोत्तम महाराज मोरे देहूकर, संत चोखामेळा अध्यसनाच्या अध्यक्षा प्रा. उल्का चंदनशिवे, संमेलनाचे निमंत्रक, संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे संस्थापक सचिन पाटील मंचावर होते.
ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, चोखोबा गाथा तसेच संत चोखामेळा महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करताना ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर, प्राचार्य डॉ. अप्पासाहेब पुजारी, ह. भ. प. माणिकबुवा मोरे महाराज, ह. भ. प. माधव महाराज नामदास, ह. भ. प. प्रा. पुरुषोत्तम महाराज मोरे देहूकर, प्रा. उल्का चंदनशिवे, सचिन पाटील आदी.
ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, चोखोबा गाथा तसेच संत चोखामेळा महाराज यांच्या मूर्तीचे पूजन व दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन झाले.ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर पुढे म्हणाले, संत चोखामेळा यांचे कार्य त्यांच्या रचनांमधून दिसून येते. त्यांच्या साहित्याविषयी चिंतन-अभ्यास करणारे अनेक अभ्यासक या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एकत्रित येत आहेत, ज्याने उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन घडेल.
पंढरपूरमधील सर्व महाराजांसमोर अशा अभ्यासकांचे चिंतन सादर व्हावे, यासाठी तुकाराम भवन मंदिरातर्फे निश्चितच प्रयत्न केले जातील. दुसरे संत चोखामेळा साहित्य संमेलन पंढरपूर येथे भरवावे यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. संमेलनाध्यक्ष प्राचार्य अप्पासाहेब पुजारी यांनी संतांच्या मंदिरांच्या दुरवस्थेबाबत केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देऊन औसेकर यांनी पंढरपूर मंदिर समितीतर्फे महाराष्ट्रातील संतांच्या मंदिरांची देखभाल केली जाईल असे आश्वासन दिले.
ह. भ. प. माणिकबुवा मोरे महाराज यांनी प्रास्ताविकात संत चोखामेळा यांचे साहित्य समाजापर्यंत पोहोचावे या उद्देशाने संमेलनाचे आयोजन सचिन पाटील यांच्या संकल्पनेतून केले असल्याचे स्पष्ट केले.
प्रा. उल्का चंदनशिवे म्हणाल्या, महाराष्ट्र ही महान संतांची भूमी आहे त्यातील आळंदी या पुण्यक्षेत्री पहिले संत चोखामेळा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे ही गर्वाची बाब आहे. समतेचे विचार प्रफुल्लीत करण्यात चोखाबा आणि त्यांच्या कुटुंबियांचा मोलाचा वाटा आहे. बाराव्या शतकात समतेचे, जात निर्मूलनाचे संत चोखोबा यांनी रुजविलेले विचार आजही मार्गदर्शक आहेत.
प्रत्येक संतांच्या ठिकाणी संमेलन व्हावे, तसेच प्रत्येक कीर्तनकाराने चोखोबा व कुटुंबिय यांच्या अभंगांचा कीर्तनात समावेश करावा, अशी अपेक्षा स्वागताध्यक्ष ह. भ. प. माधव महाराज नामदास यांनी व्यक्त केली.
मान्यवरांचे स्वागत प्रा. अप्पासाहेब पुजारी, प्रा. उल्का चंदनशिवे, ह. भ. प. माणिकबुवा मोरे महाराज देहूकर, माणिकराव सोनवणे, प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे, प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ यांनी केले. सूत्रसंचालन ह. भ. प. प्रसाद माटे महाराज यांनी तर ह. भ. प. माधव महाराज नामदास यांनी आभार मानले.
—————––—–————————————–
जाहिरात