गोल्डन आय न्यूज नेटवर्क
वैज्ञानिक लिखाण मनोरंजनात्मक असावे : डॉ. जी. डी. यादव!
मानवी बुद्धिमत्ताच सर्वश्रेष्ठ : डॉ. जी. डी. यादववैज्ञानिक लिखाणातून समाजप्रबोधन व्हावे : डॉ. जी. डी. यादव !
डॉ. नारळीकर यांच्या लिखाणाचा कित्ता विज्ञान लेखकांनी गिरवावा : डॉ. जी. डी. यादव !
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणेतर्फे विज्ञान लेखकांचा सन्मान !!
पुणे : डॉ. जयंत नारळीकर हे अतिशय विद्वान शास्त्रज्ञ होते. त्यांनी साध्या, सोप्या आणि सरळ भाषेत विज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे; ज्यातून अनेक विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक गोडी निर्माण झाली आणि प्रेरणा मिळाली.
विज्ञानात फक्त सत्यच जिवंत राहत असले तरी विज्ञान मनोरंजित करून समाजासमोर आणल्यास ते आकलन करण्यास सोपे जाते, असे प्रतिपादन नामवंत शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. जी. डी. यादव यांनी केले. पुरस्कारप्राप्त विज्ञान लेखकांनी डॉ. नारळीकर यांच्यासारखेच कार्य समाजसाठी करणे आवश्यक असून विज्ञान लिखाणातून समाजाचे प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे आयोजित सत्कार समारंभात (डावीकडून) रवींद्र डोमाळे, डॉ. दिनेश अमळनेरकर, डॉ. विनिता आपटे, सचिन ईटकर, प्रा. मिलिंद जोशी, डॉ. दीपक शिकारपूर, डॉ. जी. डी. यादव, डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. के. सी. मोहिते, डॉ. अशोक जोशी, प्राचार्य एस. एन. सपली.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणेतर्फे शनिवारी (दि. १९) प्रख्यात खगोल भौतिक शास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक पद्मविभूषण कै. जयंत नारळीकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून विज्ञान लेखकांचा सन्मान करण्यात आला.
नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजीनगर येथील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सच्या फिरोदिया सभागृहात आयोजित कार्यक्रमात माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी, संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन तर डॉ. अविनाश भोंडवे (आरोग्य), डॉ. विनिता आपटे (पर्यावरण), डॉ. के. सी. मोहिते (भौतिकशास्त्र) यांचा कै. जयंत नारळीकर स्मृती विज्ञान लेखन पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण डॉ. जी. डी. यादव यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अशोक जोशी (अमेरिका) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणेचे अध्यक्ष सचिन ईटकर, रवींद्र डोमाळे, नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य एस. एन. सपली मंचावर होते. याच कार्यक्रमात डॉ. दीपक शिकारपूर यांच्या ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (२०२५++)’ या ६३व्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हे पुस्तक कै. जयंत नारळीकर यांना अर्पण केले आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी बुद्धिमत्तेवर कधीच मात करू शकणार नाही असे ठामपणे सांगून डॉ. जी. डी. यादव पुढे म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता ही पूर्णत: मानवाने पुरविलेल्या माहितीवर अवलंबून असल्यामुळे चुकीची माहिती दिल्यास कृत्रिम बुद्धिमत्ता अयोग्य पद्धतीने माहितीचे विश्लेषण देऊ शकते हा मोठा धोका लक्षात घेणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले, विज्ञान क्षेत्रात फक्त कृत्रिम बुद्धिमत्ताच नव्हे तर सगळ्या विज्ञान शाखांचे महत्त्व आहे.
अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. अशोक जोशी म्हणाले, डॉ. नारळीकर हे आमच्यासाठी दैवतासमान होते. आम्ही विकसित भारत निर्मितीसाठी प्रयत्नशील आहोत.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, डॉ. जयंत नारळीकर यांच्या स्मृती जतन करण्यासाठी विज्ञान लेखकांना पुरस्कार देणे ही संकल्पना कौतुकास्पद आहे. डॉ. नारळीकर यांनी वैज्ञानिक संकल्पना सोप्या शब्दात सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवून त्यांच्यासाठी विज्ञान विषयक दालन खुले करण्याचे महान कार्य केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात डॉ. दीपक शिकारपूर मातृभाषेतून समाजाला जागृती देत आहेत तर डॉ. अविनाश भोंडवे आपल्या लेखनातून समाजासाठी आरोग्य जागर करत आहेत.
तसेच डॉ. विनिता आपटे आपल्या कार्यातून पर्यावरण भान जपत असून डॉ. के. सी. मोहिते आडगावात राहूनही संशोधन कार्यात सक्रिय आहेत.
सत्काराला उत्तर देताना डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, सर्वसामान्य मराठी वाचकांना माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्ञान मिळावे याकरिता मी लिखाण करत गेलो.
या तंत्रज्ञान क्षेत्रात सातत्याने बदल होत गेल्याने माझ्या लेखन कक्षा रुंदावत गेल्या. मातृभाषेत वैज्ञानिक लिखाण केल्याने मला पुरस्कार मिळाला याचा विशेष आनंद आहे. डॉ. जयंत नारळीकर यांनी प्रोत्साहित केल्यामुळे विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयी व्याख्यानांद्वारे मार्गदर्शन करीत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मदतनीस म्हणून व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. विनिता आपटे, डॉ. के. सी. मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकात सचिन ईटकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले तर आभार प्राचार्य एस. एन. सपली यांनी मानले.