गोल्डन आय न्यूज नेटवर्क
वाचनातूनच मिळाली लेखनाची उर्मी : आराध्या, साची, पालवी !
‘भावार्थ’ आणि संवाद पुणे आयोजित पहिल्या बालसाहित्य महोत्सवाला सुरुवात !!
पुणे : शब्दसंग्रहणे वाढणे, लेखकाच्या भावना शब्दातून समजून घेणे, मानसिक ताणातून मुक्तता मिळण्याबरोबरच बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी आम्ही नियमित वाचन करतो यातूनच लिखाणाची उर्मी मिळाली, असे बाललेखक साची भांड, पालवी मालुंजकर व आराध्या नंदकर यांनी सांगितले. तर रामायण, नॉर्वेजिअन वूड, हॅरी पॉटर याचबरोबर सुधा मूर्ती, रस्किन बाँड यांची पुस्तके वाचायला आवडतात असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
पुस्तक वाचन चळवळ राबविणाऱ्या ‘भावार्थ’ आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 18 ते 25 एप्रिल 2024 या कालावधीत ‘भावार्थ साहित्य दालन’, सक्सेस स्क्वेअर, कर्वेपुतळ्याजवळ, कोथरूड येथे पहिल्या बालसाहित्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याची सुरुवात गुरुवारी (दि. 18) बाललेखक साची भांड, पालवी मालुंजकर व आराध्या नंदकर यांच्या हस्ते पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करून झाली.
त्यानंतर आयोजित संवादात्मक कार्यक्रमात त्या तिघी बोलत होत्या. त्यांच्याशी बालसाहित्यकार राजीव तांबे यांनी संवाद साधाला. बालसाहित्य महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी नॅशनल बुक ट्रस्टचे विश्वस्त राजेश पांडे, राजीव नंदकर, भावार्थचे सल्लागार प्रसाद मिरासदार, संवाद पुणेचे सुनील महाजन, भावार्थचे संस्थापक प्रसन्न करंदीकर, भावार्थच्या व्यवस्थापिका कीर्ती जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
भावार्थ’ आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या बालसाहित्य महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित साची भांड, आराध्या नंदकर, पालवी मालुंजकर, राजेश पांडे, राजीव तांबे, सुनील महाजन, प्रसाद मिरासदार आदी.
पहिल्या बालसाहित्य महोत्सवाला बालगोपाळांचा पालकांसह उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘साचीच्या गोष्टी’, ‘सर्जक पालवी’ आणि ‘सारा पार्कर ॲण्ड द मॅजिकल ऑर्ब’ या पुस्तकांचे प्रकाशन या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते झाले.
कोरोना काळात या तीनही बाललेखिकांचा लेखन प्रवास सुरू झाला. पालवी हिने अनेक विषयांवर वर्डप्रेससाठी लिखाण केले ज्यात तिने अनेक जागतिक विषयांवरही आपली मते प्रकट केली. त्यातूनच या लिखाणाला पुस्तकाचे स्वरूप प्राप्त झाले. ती म्हणाली, अनेक दिवसांपासून टिव्ही बघणे बंद केले आहे; परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध विषयांवर माहिती घेण्याची आवड आहे आणि त्यातूनच लेखनाची स्फूर्ती मिळते.
मला लहानपणापासूनच गोष्टी सांगण्याची आवड होती असे सांगून साची म्हणाली, मी शाळेतही रंगवून-रंगवून गोष्टी सांगत असे.
तेव्हा शाळेतील शिक्षकांनी मला वेगवेगळ्या चित्रांवर गोष्टी लिहिण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर माझ्या गोष्टींचे आजोबांनी व्हिडिओ केले. या गोष्टींना पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर आणले.आराध्या म्हणाली, मला वाचनाची खूप आवड आहे. या वाचनातूनच मला गोष्टी सुचत गेल्या. त्यातून माझे कल्पनाविश्व भरारी घेऊ लागले आणि मी एक गोष्ट लिहिली. ही गोष्ट दीर्घ स्वरूपातील असल्याने त्याचे पुस्तक केले.
राजीव तांबे म्हणाले, आपण पाहण्यासाठी, कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी वाचन करतो कारण स्क्रिनच्या माध्यमातून आपली कल्पनाशक्ती कमी होते. परंतु वाचताना बघण्याचे आणि कल्पना करण्याचे स्वातंत्र्य असते. वाचनातून वेगळ्या विश्वाची ओळख होते मेंदू कार्यरत राहतो आणि बहुविध विचारांना चालना मिळते.
‘भावार्थ’चा प्रवास कसा सुरू झाला या विषयी प्रसन्न करंदीकर यांनी माहिती सांगितली.
मराठी पुस्तके व सांस्कृतिक उपक्रमांसाठी तसेच बाललेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘भावार्थ’ विविध उपक्रम राबवित आहे, असे त्यांनी सांगितले.
‘भावार्थ’च्या उपक्रमाचे कौतुक करून राजेश पांडे म्हणाले, ‘डिजिटल युगात लोक लिहायला-वाचायला विसरले आहेत. अशा काळात या बाललेखिका लिखाण करीत आहेत याचा आनंद आहे.
भविष्यात या तीनही लेखिकांची पुस्तके एनबीटीतर्फे प्रकाशित करू अशी ग्वाही त्यांनी दिली.प्रस्तावनेत प्रसाद मिरासदार यांनी बालसाहित्य महोत्सवाच्या उपक्रमातून बाललेखकांना मोठे दालन खुले होऊ शकते. वाचन चळवळीतून पुणे जागतिक स्तरावर पुस्तकांचे शहर व्हावे, अशी अपेक्षा आहे.
संवाद पुणेचे सुनील महाजन यांनी मनोगत व्यक्त करताना भावी पिढीच्या लेखकांचे कौतुक केले व या लेखिकांचे अनुकरण व्हावे आणि मोबाईल युगातही वाचन संस्कृतीचे जतन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
मान्यवरांचे स्वागत प्रसन्न करंदीकर यांनी केले. बाललेखिकांचा सत्कार राजीव तांबे आणि राजेश पांडे यांनी केला. सूत्रसंचालन कीर्ती जोशी यांनी केले.
आज (शुक्रवार) महोत्सवात
साधना प्रकाशनतर्फे ‘श्यामची आई’ चित्रपटातील गौरी देशपांडे (आई) आणि शर्व गाडगीळ (श्याम) यांच्याशी गप्पा-गोष्टींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
————————————————————–
जाहिरात