गोल्डन आय न्यूज नेटवर्क
डॉ. सलील कुलकर्णी यांच्या स्वरांमध्ये एकाग्रता तर लय-तालामध्ये आत्मविश्वास : पंडित सुरेश तळवलकर !
डॉ. सलील कुलकर्णी स्वरांविषयी संवेदनशील कलाकार : पंडित सुरेश तळवलकर !
साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे डॉ. सलील कुलकर्णी यांचा साई पुरस्काराने गौरव !!
पुणे : कलाकाराच्या स्वरांमध्ये एकाग्रता आणि लय-तालामध्ये आत्मविश्वास असावा लागतो, तो डॉ. सलील कुलकर्णी यांच्यात दिसून येतो. संगीतातील विषय रसिकांपर्यंत पोहोचविणारे ते संगीतकार आहेत, असे गौरवोद्गार तालयोगी, पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांनी काढले.
साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे यंदाचा साई पुरस्कार गायक-संगीतकार, दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांना बुधवारी पंडित सुरेश तळवलकर आणि ज्येष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी तळवलकर बोलत होते. साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पीयूष शहा व्यासपीठावर होते. पुणेरी पगडी, शाल, सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराचे यंदाचे 17वे वर्ष आहे.
साईनाथ मंडळ ट्रस्ट आयोजित साई पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित (डावीकडून) पीयूष शहा, श्रीधर फडके, डॉ. सलील कुलकर्णी, पंडित सुरेश तळवलकर.
पियूष शहा, अध्यक्ष, साईनाथ मंडळ ट्रस्ट
साई मंदिर, भाऊसाहेब रंगारी पथ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पंडित सुरेश तळवलकर पुढे म्हणाले, डॉ. सलील कुलकर्णी यांच्यात असलेली स्वरांविषयीची संवेदनशीलता मी पाहिलेली आहे. त्यांचे कलेविषयीचे विश्लेषणही अभ्यासपूर्ण आणि मार्मिक असते. संगीतातील विचार त्याच्या खोलीवरून ठरतात, ही नजरेची खोली डॉ. सलील यांना लाभली आहे.
श्रीधर फडके म्हणाले, सलीलजींची गाणी अबालवृद्धांना प्रिय आहेत. उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.सत्काराला उत्तर देताना डॉ. सलील कुलकर्णी म्हणाले, प्रत्येक पुरस्कार मिळताना आनंद असतो. पुरस्कार कोठे आणि कुणाच्या हस्ते मिळतो यालाही फार महत्त्व असते. कलाकार हा श्रद्धाळू असतो. त्याच्या घडण्यात देवाचे आणि मोठ्यांचे आशीर्वाद लाभलेले असतात.
परिक्षकाच्या भूमिकेत असताना समोरचा कलाकार हा आपलेच अपत्य आहे या नजरेतून त्याचे कौतुक करून मग त्याच्यातील उणीवा दाखविणे आवश्यक असते. साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे समाजजागृतीचे काम मोठ्या प्रमाणात चालू असल्याबद्दल कुलकर्णी यांनी ट्रस्टच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मंडळाचे अध्यक्ष पीयूष शहा यांनी ट्रस्टच्या वाटचालीचा आढावा सादर करत समाजोपयोगी उपक्रमांविषयी माहिती सांगितली. गणेशोत्सव मंडळे ही सांस्कृतिक पुण्याचा महत्त्वाचा हिस्सा आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस चिमुकल्यांनी डॉ. सलील कुलकर्णी यांच्या गीतांवर नृत्य सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर हेमंतराजे मावळे यांनी केले. मान्यवरांचा सत्कार अमर राव, नरेंद्र व्यास, शंकर निंबाळकर, संकेत निंबाळकर यांनी केला. आभार प्रवीण वळवडेकर यांनी मानले. अमर राव, अमित दासानी, नंदू ओव्हाळ, प्रशांत पंडित, प्रसाद भोयरेकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
जाहिरात