गोल्डन आय न्यूज नेटवर्क
दातृत्वाची संवेदनशीलता प्रत्येकाकडे असावी : ह. भ. प. चंद्रकांत महाराज वांजळे !!
आशा प्रतिष्ठान ट्रस्टच्या माध्यमातून ग्रामीण, दुर्गम भागातील विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे वाटप !
पुणे : आपण संचिताचे जग पाहिले आहे; परंतु वंचितांचे जग पाहिलेले नाही. देशात सुधारणा होत आहेत पण इंडिया आणि भारत अशी सध्याची स्थिती आहे. इंडियाबरोबर आपल्याला भारतालाही घेऊन जायचे आहे. आशा प्रतिष्ठान ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी करीत असलेली मदत मोलाची आहे.
शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थिनींसमवेत ह. भ. प. चंद्रकांत महाराज वांजळे, पांडुरंग सांडभोर, पुरुषोत्तम डांगी, चंदन डाबी, अंजली लोणकर आदी.
समाजाचे आपणही देणे लागतो ही दातृत्वाची संवेदनशीलता प्रत्येकाकडे असावी अशी अपेक्षा भागवताचार्य ह. भ. प. चंद्रकांत महाराज वांजळे यांनी व्यक्त केली.दुर्गम, ग्रामीण, शहरी झोपडपट्टी भागातील हलाखीची आर्थिक परिस्थिती असलेल्या गुणवंत विद्यार्थिनींना आशा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने आज (दि. 28) ‘आशा शिष्यवृत्ती’ प्रदान सोहळ्याचे पत्रकार भवन येथे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी वांजळे बोलत होते. पी. ई. सोसायटीच्या उपकार्यवाह डॉ. निवेदिता एकबोटे, आशा प्रतिष्ठानच्या विश्वस्त अंजली लोणकर, पुरुषोत्तम डांगी, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, चंदन डाबी, डॉ. अधीर तांदळे, प्रतिक डांगी, अभिषेक मालपाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामीण भागातील 40 विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.
यात अंध, अपंग तसेच एकल पालक असलेल्या विद्यार्थिनींचाही सहभाग आहे. कला आणि क्रीडा क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या विद्यार्थिनींचा तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सकारात्मक दृष्टीने कार्य करणाऱ्या शिक्षकांचा या वेळी सन्मान करण्यात आला. मुलींचे शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. मदतीचे यंदाचे चौथे वर्ष आहे.
ह. भ. प. चंद्रकांत महाराज वांजळे पुढे म्हणाले, आजच्या संवेदनाहीन काळात आशा प्रतिष्ठान ट्रस्ट ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना करत असलेली मदत मोलाची असून आशा फाउंडेशनने सामाजिक उत्तरदायित्व जपले आहे. विद्यार्थिनी शिकल्यानंतर त्या मोत्यासारख्या चमकतील. मदतीचा हा सोहळा चांगुलपणा वाढविणारा आहे. प्रतिष्ठानचे कार्य बघून वांजळे यांनी अकरा हजार रुपयांची मदत जाहीर केली.
डॉ. निवेदिता एकबोटे म्हणाल्या, विद्यार्थिनींना यश संपादन करण्यासाठी आशा प्रतिष्ठानतर्फे होणारी मदत मोलाची आहे. कुवत असूनही मदत न मिळाल्याने मागे पडणाऱ्या विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचा नक्कीच उपयोग होईल. आशा प्रतिष्ठानसारखे कार्य मोठ-मोठ्या शैक्षणिक संस्थांकडून झाले पाहिजे. आज ग्रामीण भागातील मुले उच्च शिक्षण घेत आहेत याचे कौतुक आहे. भारतात आज तळागाळातील विद्यार्थी शिक्षित होऊन पुढे येत आहे त्यांना आधार-प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी संघर्षाला नकारात्मकतेने न घेता आपली वाटचाल यशस्वीरित्या पूर्ण केली पाहिजे.
पांडुरंग सांडभोर म्हणाले, ग्रामीण भागातील आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण दूर करण्याचे काम आशा फाउंडेशन करत आहे, हे खरे माध्यमकर्मी आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे जास्त प्रमाणात क्षमता आहेत, त्यामुळे त्यांनी आपली आवड ओळखून स्वप्ने पहावीत आणि ध्येय ठरवावीत. संघर्षमय वाटेने जाल तेव्हाच यश, आनंद मोठ्या प्रमाणात मिळेल.
श्रेया सावंत, अनिता ढेबे, स्नेहल पतंगे, ऋचा परदेशी या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. शिष्यवृत्तीमुळे देव भेटल्याचा अनुभव आला. कोळशाचा हिरा बनताना जसे खूप सोसावे लागते त्या प्रमाणे आम्हाला यश संपादन करण्यासाठी परिश्रमाशिवाय पर्याय नाही. मदतीमुळे स्वप्ने साकार करण्यास मदत मिळणार आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
संस्थेच्या विश्वस्त अंजली लोणकर यांनी प्रास्ताविकात प्रतिष्ठानच्या कार्याविषयी माहिती दिली. शिक्षणाचा पाया भक्कम करा आणि न घाबरता स्वत:ला घडवा, असा संदेश त्यांनी विद्यार्थिनींना दिला.मान्यवरांचे स्वागत अंजली लोणकर, पुरुषोत्तम डांगी, चंदन डाबी यांनी केले. सूत्रसंचालन गणेश ठाकर यांनी तर आभार पुरुषोत्तम डांगी यांनी मानले.
जाहिरात