गोल्डन आय न्यूज नेटवर्क
कलेमुळे जीवन कळते : सतीश आळेकर !!
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेचे पारितोषिक वितरण !!
पुणे : कला ही कधीच वाईट नसते, ती चांगली अथवा अधिक चांगली असते. कलेमुळे जीवन कळते. कला जगण्याला उर्जा देते तसेच काहीतरी शिकवत असते. आयुष्यातील अज्ञात भाग पकडत असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री सतीश आळेकर यांनी केले.
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेचे पारितोषिक वितरण आज (दि. 28) आळेकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. भरत नाट्य मंदिरात पारितोषिक वितरण सभारंभ आयोजित करण्यात आला होतो. माध्यमिक गटासाठी आयोजित स्पर्धेत 25 शाळांचे संघ सहभागी झाले होते.
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेत सांघिक प्रथम क्रमांकाचा राजा नातू करंडक स्वीकारताना आर्यन्स वर्ल्डस् स्कूल, भिलारेवाडीचा संघ. समवेत सतीश आळेकर, अनंत निघोजकर, मकरंद केळकर, गणेश इनामदार, डॉ. अंजली कराडकर.
स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. महाराष्ट्रीय कलोपासकचे अध्यक्ष अनंत निघोजकर, उद्योजक मकरंद केळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. गणेश इनामदार, डॉ. अंजली कराडकर, इंद्रायणी चव्हाण यांनी स्पर्धेचे परिक्षण केले. सुरुवातीस स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेली तसेच नाविन्यपूर्ण व कल्पक सादरीकरणासाठीचे पारितोषिक मिळविलेली एकांकिका सादर करण्यात आली.
आळेकर म्हणाले, नाटक अजूनही शब्दप्रधान आहे. पूर्वी नाटक लिखित वाङ्मयावर आधारित असे, परंतु आजचे नाटक मीडियाच्या माध्यमातून आलेले आहे, असे जाणवते. रंगमंचावर सतत काहीतरी घडले पाहिजे, सांगण्याची घाई आहे असे दिसते, असे त्यांनी सादर करण्यात आलेल्या एकांकिकांचे अवलोकन केल्यानंतर नमूद केले.
नाटक सादर करताना शब्दोच्चार आत्मविश्वासपूर्वक, खणखणीत आणि अर्थवाही बोलला गेला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी शिक्षक प्रतिनिधींना दिला. क्लासेसच्या उतरणीत नाटकांचा क्रम अग्रक्रमी ठेवावा असे सांगून विद्यार्थी व मुलांसाठी लेखन कार्यशाळा घेतल्या जाव्यात अशी सूचनाही त्यांनी केली.
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेत नाविन्यूपर्ण व कल्पक सादरीकरणासाठीचा मथुरा माई करंडक स्वीकारताना डॉ. श्यामराव कलमाडी हायस्कूल, गणेशखिंडचा संघ. समवेत सतीश आळेकर, अनंत निघोजकर, मकरंद केळकर, गणेश इनामदार, डॉ. अंजली कराडकर.
परिक्षकांच्या वतीने बोलताना डॉ. अंजली कराडकर म्हणाल्या, स्पर्धेमध्ये सादरीकरण करण्यापूर्वी त्याविषयी जाणत्या लोकांची मते घेणे आवश्यक वाटते. संहिता पूर्णत्वाला जाणे अपेक्षित आहे. गणेश इनामदार म्हणाले, विद्यार्थ्यांनी वाचिक व मुद्राभिनयावर भर देणे गरजेचे आहे.
स्पर्धेच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या पडद्यामागील कार्यकर्त्यांचे मकरंद केळकर यांनी कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी वाघ यांनी तर निकाल वाचन आणि आभार प्रदर्शन महाराष्ट्रीय कलोपासकचे चिटणीस ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी केले.
विद्यार्थ्यांची घोषणाबाजी
पारितोषिक वितरण समारंभादरम्यान विजेत्या संघातील विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘आव्वाज कुणाचा?’, ‘येऊन येऊन येणार कोण; आमच्याशिवाय आहेच कोण’, ‘आले रे आले..’, ‘राजा नातूला दादागिरी कोणाची?’ अशा घोषणांनी विद्यार्थ्यांनी नाट्यगृहाचे आवार दणाणून सोडले.
जाहिरात