गोल्डन आय न्यूज नेटवर्क
सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी ‘रामरक्षा’ स्तोत्रमंत्रावरील प्रवचनांची सुरुवात रामरक्षेच्या पहिल्या दोन ओळींचे स्पष्टीकरण करून केली. पुढे सद्गुरु बापूंनी, ‘रामरक्षा’ हे एकाच वेळी स्तोत्र आणि मंत्रदेखील कसे आहे व म्हणूनच ते केवळ स्तोत्र नसून ते ‘स्तोत्रमन्त्र’ कसे आहे, हे वेगळेपण अत्यंत सुस्पष्टतेने समजावले.
त्यानंतर, २१-ऑक्टोबर २००४ च्या ह्या दुसऱ्या प्रवचनात बापू, ‘श्री सीतारामचंद्रो देवता’ ह्या रामरक्षेतील ओळींचा अर्थ उलगडून सांगत आहेत.
ह्या प्रवचनात सद्गुरु बापू प्रथम, ‘मंत्र-देवता’ म्हणजे काय, ती कशी निर्माण होते, ती कशी कार्य करते आणि मंत्राचा जप करणाऱ्या साधकाला ती काय प्रदान करते, हे स्पष्ट करतात.
आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या अशा ह्या संकल्पनेचे स्पष्टीकरण करताना, बापू ‘सांघिक उपासनेचे’ महत्त्व काय हेही अधोरेखित करतात व दररोजची ‘नित्य उपासना’ का चुकवू नये हेदेखील सांगतात.
यानंतर बापू, ‘श्रीराम सूर्यकुलोत्पन्न असूनही त्याला ‘रामचंद्र’ का म्हणतात’ ते विशद करताना, महाविष्णूच्या एका भक्ताची कथा सांगतात; आणि मानव जो नेहमी केवळ लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी धडपडत असतो ते बरोबर नसून, लक्ष्मीची उपासना महाविष्णू समवेतच का आवश्यक आहे, हे पटवून देतात.
पुढे बापू, ‘मंत्र’ वा ‘स्तोत्रा’पेक्षा ‘स्तोत्रमंत्र’ कसे वेगळे असते व ते कसे कार्य करते हेही विस्तृतपणे व संदर्भासहित स्पष्ट करतात.यानंतर जीवनातील ‘खरा खजिना’ कोणता, हे स्पष्ट करताना सद्गुरु बापू, संत सावता माळी यांची एक कथा सांगतात आणि काय केले म्हणजे आपल्या जीवनामध्ये हा खजिना कुठेच कमी पडणार नाही, याचा अत्यंत भावपूर्ण उलगडा करतात.