गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पुरुषोत्तम सदाफुले विचारवंत कार्यकर्ते : डॉ. श्रीपाल सबनीस
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी, आडकर फौंडेशनतर्फे पुरुषोत्तम सदाफुले यांचा काव्य जीवनसाधना पुरस्काराने गौरव !
पुणे : महाराष्ट्रातील प्रख्यात साहित्यिक, विचारवंत आणि महापुरूष यांच्या विचारांची बेरीज करून समाजातील सर्वच क्षेत्रात वावरणारे पुरुषोत्तम सदाफुले हे विचारवंत कार्यकर्ते आहेत. प्रत्येकाला आनंद देण्याचा ध्येयवाद त्यांनी जोपासला आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी, पुणे आणि आडकर फौंडेशनतर्फे कामगार शिक्षक, कामगार साहित्यिक, कवी आणि कामगार भूषण पुरुषोत्तम सदाफुले यांचा आज (दि. 16) आडकर फौंडेशन पुरस्कृत काव्य जीवनसाधना पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्या वेळी डॉ. सबनीस अध्यक्षपदावरून बोलत होते.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी, पुणे आणि आडकर फौंडेशन आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात (डावीकडून) प्रा. ललिता सबनीस, ॲड. प्रमोद आडकर, डॉ. श्रीपाल सबनीस, पुरुषोत्तम सदाफुले, रामदास फुटाणे, सचिन ईटकर, उद्धव कानडे.
पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा फुले पगडी, शाल, सन्मानपत्र, मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ कवी, वात्रटिकाकार रामदास फुटाणे आणि डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले.
महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणीचे कार्याध्यक्ष उद्धव कानडे, कवयित्री प्रा. ललिता सबनीस व्यासपीठावर होते.
डॉ. सबनीस पुढे म्हणाले, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात समर्पित कार्यकर्त्यांची फौज आवश्यक असते.
हे कार्य सदाफुले अनेक वर्षांपासून करीत आहेत. सांस्कृतिक क्षेत्रातील बेरीज त्यांनी केली आहे.
पुण्यातील प्रत्येक घरात एक समीक्षक आहे. पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातून ॲड. प्रमोद आडकर, सचिन ईटकर यांची नावे वगळली तर पुण्याचे सांस्कृतिक जीवन समजणार नाही, असे गौरवाने नमूद करून रामदास फुटाणे म्हणाले, सदाफुले यांच्या कार्यामुळे कामगारांचे सांस्कृतिक जीवन फुलले आहे.
समता-बंधुतेचे विचार त्यांनी आपल्या कार्यातून पेरले आहेत.सत्काराला उत्तर देताना पुरुषोत्तम सदाफुले यांनी आधुनिक वाल्मिकी गदिमा यांच्यापासून कवी नारायण सुर्वे यांच्या सान्निध्यातील आठवणींना उजाळा दिला. कामगारांची लेखणी समाजासमोर आली पाहिजे या एकाच ध्येयाने वाटचाल केली असल्याचे त्यांनी सांगितले.
ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद करून पुरुषोत्तम सदाफुले यांच्या कार्याची ओळख करून दिली.
सचिन ईटकर म्हणाले, सांस्कृतिक पार्श्वभूमी नसलेल्या पिंपरी परिसरात सदाफुले यांनी सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
त्यातूनच अनेक कार्यकर्तेही घडले आहेत.
मान्यवरांचा सत्कार ॲड. प्रमोद आडकर, सचिन ईटकर यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन उद्धव कानडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘समतेच्या वाटेवर’ या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यात डॉ. जगदीश कदम, अंजली कुलकर्णी, माधव पवार, भरत दौंडकर, बंडा जोशी, मृणालिनी कानिटकर-जोशी, ज्योत्स्ना चांदगुडे, शिवाजी चाळक, डॉ. संभाजी मलघे, डॉ. राजेश गायकवाड, अस्मिता चांदणे, प्रभाकर वाघोले, संगीता झिंजुरके, दत्तात्रय जगताप, मानसी चिटणीस, राजेंद्र वाघ, वर्षा बालगोपाल, सुरेश कंक, महेंद्र फाटे यांचा सहभाग होता.
जाहिरात