गोल्डन आय न्यूज नेटवर्क
डिजिटल तंत्रज्ञानाचे दुष्परिणामही समजून घ्या
गुरुतत्त्वयोग संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त डिजिटल प्रदुषण विषयावर चर्चा !
27वा वर्धापन दिन उत्साहात साजरा : गुरुतत्त्ववेध स्मरणिकेचे प्रकाशन !
पुणे : डिजिटल तंत्रज्ञान ही आजच्या काळाची गरज असून त्याचा वापर आपण थांबवू शकत नाही, पण त्याचा अतिरेकी वापर टाळू शकतो. या तंत्रज्ञानाने मानवाला प्रगतीची दारे खुली करून दिली असली तरी हे तंत्रज्ञान निसर्गातील जीव-जंतू, प्राणिमात्र, वनस्पतींच्या नाशाला कारणीभूत ठरत आहे.
निसर्गाचा समतोल साधण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाच्या दुष्परिणामांची बाजू जगासमोर येणे आवश्यक आहे, असे मत चर्चेदरम्यान व्यक्त करण्यात आले.गुरुतत्त्वयोग संस्थेच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त ‘डिजिटल प्रदुषण’ या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली होती.
गुरुतत्त्वयोग स्मरणिकेचे प्रकाशन करताना (डावीकडून) संदीप दिवाण, अभयकुमार सरदार, कौस्तुभ मुद्गल, तेजा दिवाण.
गुरुतत्त्वयोग संस्थेच्या ध्यानमंदिरात हा चर्चात्मक कार्यक्रम झाला. डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव समाजाला करून देण्यासाठी गुरुतत्त्वयोग संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डिजिटल तंत्रज्ञानाचे अभ्यासक कौस्तुभ मुद्गल यांच्याशी संस्थेचे विश्वस्त संदीप दिवाण यांनी संवाद साधला.
या प्रसंगी गुरुतत्त्वयोग संस्थेचे संस्थापक अभयकुमार सरदार, विश्वस्त तेजा दिवाण उपस्थित होते. ‘गुरुतत्त्ववेध’ या स्मरणिकेचे प्रकाशन या प्रसंगी झाले. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या आवारात ‘डिजिटल प्रदुषण’ या विषयावर प्रदर्शनी भरविण्यात आली होती.
जागतिक तापमान वाढ, प्रदुषणामुळे होणारे निसर्गाचे नुकसान, वातावरण बदल, जंगलतोड या विषयी चर्चा होत असते. परंतु डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कागदाचा कमीतकमी वापर, दळणवळणाची गरज कमी होत असली तरी या तंत्रज्ञानाच्या वापरानेही प्रदुषण होत आहे या विषयी कोणी बोलत नाही. या डिजिटल तंत्रज्ञानासाठी लागणारी पूरक यंत्रणा किती जास्त प्रमाणात प्रदुषणकारी आहे याचे समाजभान आणणे आवश्यक असल्याचे कौस्तुभ मुद्गल म्हणाले.
डिजिटल उपकरणांचे उत्पादन करताना मोठ्या प्रमाणावर कार्बन उत्सर्जन होते तसेच इंटरनेटवर डेटा साठविण्यासाठी वापरली जाणारी यंत्रणाही मोठ्या प्रमाणात प्रदुषण करीत असते. या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना सजग राहणे अत्यंत आवश्यक आहे, असेही मुद्गल म्हणाले.
गुरुतत्त्वयोग तत्त्वज्ञानात सामुदायिक सहजीवनाला अनन्य साधारण महत्त्व आहे. संपूर्ण विश्वाचे जगणे हे आपले जगणे असते. हे विश्व व त्यातील प्रत्येक अस्तित्व हे आपल्या अस्तित्वाचे अविभाज्य घटक आहेत आणि त्यांच्या जगण्यातच आपले जगणे अंतर्भूत आहे.
आपल्या जगण्यामुळे या विश्वाला कमीतकमी हानी पोहोचेल ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे गुरुतत्त्वयोग प्रणालीचे प्रणेते अभयकुमार सरदार यांनी साधकांशी संवाद साधताना सांगितले.