गोल्डन आय न्युज नेटवर्क
प्रा. अलका सपकाळ यांचे लिखाण अंतर्मुख करणारे : डॉ. रवींद्र शोभणे !!
वादळ झेलताना काव्यसंग्रहाचे आणि ठसका वात्रटिका संग्रहाचे प्रकाशन !
पुणे : विनोद लेखनाची परंपरा खंडित होत असताना परंपरेतील, जगण्यातील विसंगती नेमकेपणाने टिपणे आणि खुमासदार शैलीत मांडणे सोपे काम नाही. प्रा. अलका सपकाळ यांचे लिखाण स्त्रीवादाच्या पलिकडे जाऊन सांगू पाहणारे आहे. त्याचप्रमाणे अंतर्मुख करणारे आहे, असे प्रतिपादन अंमळनेर येथे होत असलेल्या 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी केले.
वृंदावन फाउंडेशन आणि समीक्षा पब्लिकेशन यांच्या वतीने कवयित्री प्रा. अलका सपकाळ लिखित वादळ झेलताना या काव्यसंग्रहाचे आणि ठसका या वात्रटिका संग्रहाचे प्रकाशन डॉ. शोभणे यांच्या हस्ते आज (दि. 4) झाले. त्या वेळी ते बोलत होते. भारतीय विचार साधना सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष, वात्रटिकाकार रामदास फुटाणे होते.
वादळ झेलताना या काव्यसंग्रहाच्या आणि ठसका या वात्रटिका संग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी उपस्थित फुलचंद नागटिळक, डॉ. संदीप सांगळे, भारत सातपुते, डॉ. रवींद्र शोभणे, प्रा. अलका सपकाळ, भारत सासणे, रामदास फुटाणे, प्रभाकर साळेगावकर, प्रा. डी. जी. सपकाळ, महारुद्र जाधव.
95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे, कवी, वात्रटिकाकार भारत सातपुते, कवी, विडंबन गीतकार प्रभाकर साळेगावकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी भाषा मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे, प्रा. डी. जी. सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. शोभणे पुढे म्हणाले, प्रा. सपकाळ यांच्या लिखाणावर महापुरुषांचा प्रभाव दिसतो. महिलांमध्ये विनोदबुद्धी असते का असा प्रश्न उपस्थित केला जातो, पण विंदा करंदीकर, पाडगावकर यांच्या लिखाणाचा धागा प्रा. सपकाळ यांच्या लिखाणातून दिसतो.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना रामदास फुटाणे म्हणाले, मराठी भाषा टिकणार का या विषयावर बऱ्याचवेळा चर्चा होताना दिसते पण ग्रामीण भागातील अशिक्षित महिला त्यांची बोलीभाषा बोलत आहेत तो पर्यंत मराठी भाषेला मरण नाही.
इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी आज खरेतर मराठीतील चांगल्या बालकुमार साहित्याची गरज आहे. मी पुन्हा येईन आणि कटपिस या कविता त्यांनी याप्रसंगी सादर केल्या.भारत सासणे म्हणाले, कवी, लेखकाला स्वत:मधील आणि बाहेरील संघर्षाला सामोरे जावे लागते.
वातावरणातील गोष्टी कवी मनावर परिणाम करणाऱ्या असतात. प्रा. सपकाळ यांच्या लिखाणातून स्त्री संघर्षाचा आणि सामर्थ्यांचा डंका पिटलेला दिसून येतो, त्याचप्रमाणे त्यांच्या कविता अलवार, सुंदरही आहेत.
स्त्रीची विविध रूपे प्रा. सपकाळ यांच्या लिखाणातून अनुभवायला मिळत असल्याचे प्रभाकर साळेगावकर म्हणाले. काही कवितांमध्ये त्यांचा हळवेपणाही दिसून येतो. समाजपरिवर्तनासाठी त्यांचे लिखाण सकारात्मक ठरेल.
सुरुवातीस प्रा. अलका सपकाळ यांनी लिखाणाचा पट उलगडून दाखविला. मान्यवरांचे स्वागत सचिन पाटील आणि प्रा. डी. जी. सपकाळ यांनी केले. प्रास्ताविक महारुद्र जाधव यांनी, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली पाटील यांनी केले तर आभार डॉ. संदीप सांगळे यांनी मानले.
जाहिरात