गोल्डन आय न्यूज नेटवर्क
उत्तम गुरूंमुळे कलेचा कधी बाजार होत नाही तर आध्यात्मिकता-मर्म टिकून राहते : सावनी शेंडे.
भारतीय कलांचे मोल भारतीयांनी समजून घ्यावे : रवी देव.
अनंतरंग ॲकॅडमी ऑफ आर्ट्सतर्फे आयोजित हौशी चित्रकारांच्या ‘अनंतरंग’ प्रदर्शनाला बालगंधर्व कलादालनात सुरुवात.
अनंतरंग’ प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी चित्रगुप्त भिडे, सावनी शेंडे, रवी देव, आनंद सराफ.
पुणे : उत्तम गुरू लाभल्यास कलेचा कधीही बाजार होत नाही. त्यातील आध्यात्मिकता-मर्म टिकून राहते आणि कलाकाराला आयुष्यभर पुढे जाण्याची उर्मी देत राहते. कलेतील सकारत्मकता कलाकाराला कायम उत्तेजित ठेवते, असे प्रतिपादन प्रसिद्ध शास्त्रीय गायिका सावनी शेंडे यांनी केले.
भारतीय कलांचे मोल भारतीयांनी समजून घेणे आवश्यक आहे. कलाकाराने समाजात कलेचा प्रचार व प्रसार करणे ही कलाकाराची जबाबदारी आहे, असे मत प्रसिद्ध चित्रकार रवी देव यांनी व्यक्त केले.
अनंतरंग ॲकॅडमी ऑफ आर्ट्सतर्फे हौशी कलाकारांच्या चित्रकृतींचे ‘अनंतरंग’ प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सावनी शेंडे, रवी देव आणि सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ यांच्या उपस्थितीत आज (दि. 25) दीपप्रज्वलनाने झाले. त्या वेळी शेंडे बोलत होत्या. अनंतरंग ॲकॅडमी ऑफ आर्ट्सचे संचालक चित्रगुप्त भिडे व्यासपीठावर होते.
दि. 26 ते 29 एप्रिल या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळात पुणेकरांना हे प्रदर्शन पाहण्यासाठी विनामूल्य खुले असणार आहे.
अनंतरंग’ प्रदर्शनात चित्रकृतींची पाहणी करताना चित्रगुप्त भिडे, सावनी शेंडे, रवी देव.
आपला उद्योग-व्यवसाय सांभाळून या कलाकारांनी आपली कला जोपासली आहे. व्यवसायाने काही शिक्षक, अभियंता, गणितज्ज्ञ, आहारतज्ज्ञ तर काही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत. उद्योग व्यवसायात कार्यरत असलेल्या व्यक्तिंबरोबरच काही गृहिणींच्या कलाकृतीही प्रदर्शनात आहेत.
सावनी शेंडे पुढे म्हणाल्या की मला लहानपणापासूनच सुरांसह रंग-रेषा-सावल्यांची ओढ होती. त्या विश्वात रमायला मला आवडायचे. गाणे व चित्रकला क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्वे आयुष्यात आल्यावर माझे आयुष्य समृद्ध झाले. कलेच्या क्षेत्रातील सीमारेषा पुसट असल्याचे जाणवले.
रवी देव म्हणाले, भारतीय कला या कलेसाठी कला नसून त्या जीवनाशी जोडल्या गेल्या आहेत. त्यात पावित्र्य असून या कला संस्कार देणाऱ्या आहेत. भौतिक सुखे उपभोगली तरी मानसिक शांती मिळविण्यासाठी कलेसारखा दुसरा प्रांत नाही. कलेच्या माध्यमातून भारतीय संस्कृती टिकवली गेली पाहिजे. मुलांना कला शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, कलेचे जागरण करणे ही प्रत्येक कलाकाराची जबाबदारी आहे.
आनंद सराफ म्हणाले, अनंत भिडे हे फक्त कला शिक्षकच नव्हे तर उत्तम माणूस घडवत असत. त्यांच्या कार्याचा वसा चित्रगुप्त भिडे यांनी अखंडितपणे पुढे सुरू ठेवला आहे. शब्द-सूर-ताल-रंग-रेषा या माणसांच्या आयुष्यात रंग भरत असतात. भिडे सरांचा आशीर्वाद या प्रदर्शनातून जाणवतो.
यंदाचे हे 16वे प्रदर्शन असून 26 कलाकारांनी पेन्सिल शेडींग, वॉटर कलर, पोस्टर कलर्स, ऑईल पेंटिंग, पेन अँड इंक अशा विविध माध्यमातून साकारलेली 120 चित्रे प्रदर्शनात आहेत, अशी माहिती चित्रगुप्त भिडे यांनी प्रास्ताविकात दिली. वडिलांकडून मिळालेला कलेचा वारसा पुढे नेण्याचा मी प्रयत्न करत आहे. प्रदर्शनातील 26 कलाकार हे मोती असून त्या मोत्यांची माळ गुंफताना असणारा धागा म्हणजे मी असे मानतो.
चित्रकारांच्या वतीने सुवर्णा लेले व सोनाली फाटक यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रदर्शनाविषयची माहिती राधा जोशी यांनी दिली तर मान्यवरांचा परिचय शितल बेलसरे यांनी तर सत्कार चित्रगुप्त भिडे आणि शितल बेलसरे यांनी केला.
चित्रकारांचा सत्कार रवी देव आणि सावनी शेंडे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता भिडे यांनी केले तर आभार हेमांगी पुरोहित यांनी मानले.
जाहिरात –
जाहिरात –