रिपोर्टर – प्रसन्न पाध्ये
प्रतिकूल परिस्थितीत यश गाठणाऱ्या महिलांची यशोगाथा समाजासाठी प्रेरणादायी : रेखाताई प्रमोद महाजन
पुणे – स्वतः प्रतिकूल परिस्थितीत असूनही इतरांना मदत करणे, पिडितांना त्यांचे स्थान मिळवून देणे हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. जिद्दीच्या बळावर केलेले कार्य आणि यशस्वीतेचे गाठलेले शिखर या गोष्टी समाजासाठी प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेखाताई प्रमोद महाजन यांनी केले.
सामाजिक, साहित्य, कला, क्रीडा आणि उद्योग क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने वेगळा ठसा उमटवून समाजासमोर आदर्श निर्माण केलेल्या कर्तृत्ववान महिलांचा वृंदावन फाउंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महाजन यांच्या हस्ते जनाई-मुक्ताई समाजभूषण आणि जनाई-मुक्ताई समाजजागृती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्या वेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. गौतमी पवार होत्या. संतसाहित्याचे अभ्यासक प्रा. सोमनाथ लांडगे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विनायकराव राउत, वृंदावन फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील व्यासपीठावर होते.
उद्योजिका कमल कुंभार यांचा जनाई-मुक्ताई समाजभूषण पुरस्काराने तर पत्रकार प्रज्ञा म्हात्रे, सिंधुदुर्गच्या जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, मुख्याध्यापिका शमिका आजगांवकर, युवा अभिनेत्री अपर्णा चोथे, कवयित्री स्वप्नाली देशपांडे, सामाजिक कार्यकर्त्या कांचन बढे, उद्योजिका वृषाली शेकदार, पौर्णिमा मोहिते, अॅरड. नारसुबाई गदवालकर, ज्योती शिंदे यांचा जनाई-मुक्ताई समाजजागृती पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सन्मानपत्र तसेच संत चोखामेळा सार्थ अभंग गाथा असे पुरस्काराचे स्वरूप होते.
वृंदावन फाउंडेशन आयोजित जनाई-मुक्ताई समाजभूषण आणि जनाई-मुक्ताई समाजजागृती पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कारप्राप्त महिलांसमवेत सचिन पाटील, प्रा. सोमनाथ लांडगे, रेखाताई महाजन, डॉ. गौतमी पवार, विनायकराव राउत आदी.
अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. गौतमी पवार म्हणाल्या, आर्थिक स्वातंत्र्य, सुरक्षा आणि कुटुंबाचा पाठींबा मिळाल्यानंतर महिला किती मोठी झेप घेऊ शकतात हे पुरस्कारप्राप्त महिलांच्या कार्याकडे पाहिल्यानंतर दिसून येते. समाजाने माझ्यासाठी काय केले यापेक्षा मी समाजासाठी, देशासाठी काय करू शकते हा विचारच मोलाचा असतो. हा विचार कृतीत आणणार्याे महिलांचा गौरव होत असून त्यांचे कार्य या गौरव सोहळ्यामुळे समाजासमोर येत आहे. एखादा पुरस्कार मिळाला की, समाज जेवढ्या कौतुकाने तुमच्याकडे पाहतो तेवढीच तुमच्या कामाची अपेक्षाही वाढलेली असते. त्यामुळे आपली त्या पुरस्काराप्रती, समाजाप्रती, मुख्य म्हणजे कामाप्रती जबाबदारी वाढते. महाराष्ट्रात संत साहित्याची परंपरा आहे. त्यात विश्वास, श्रद्धा, त्याग, समर्पण या सार्यांरचे प्रतिक म्हणून जनाई-मुक्ताई यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या नावे मिळणार्याश पुरस्कारामुळे अपेक्षाही वाढतात.
कार्यक्रमाचे आयोजक सचिन पाटील यांनी रेखाताई प्रमोद महाजन यांचा सत्कार श्रीकृष्णाची मूर्ती देऊन केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी बिराजदार यांनी केले.
आभार दिपाली सोनकवडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सत्तेश्वर माने, देविदास बिनवडे, अरुण निमकरडे, विनोद सुरवसे आदिंनी परिश्रम घेतले.
पुरस्काराची अभिनव कल्पना
पुरस्कारप्राप्त महिलांचा गौरव सन्मानपत्र आणि ग्रंथ स्वरूपात करण्यात आला आहे.
रोख रक्कम न देता या महिलांना प्रत्येकी एक सायकल भेट देण्यात येणार आहे. पुरस्कारप्राप्त महिलांनी ही सायकल उपेक्षित-वंचित कुटुंबातील विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीस परिसरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या हस्ते द्यायची आहे. पुरस्काराच्या रूपाने मिळालेली सायकलभेट गरजू विद्यार्थ्यास मिळाली तर त्याचे समाधान पुरस्कारार्थी आणि संस्थेलाही वाटेल, असे सचिन पाटील यांनी या प्रसंगी सांगितले.
जाहिरात