गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘बाजीराव पेशव्यांनी गाजवलेली पालखेडची लढाई हा जागतिक युद्धांमधील मास्टरपीस’!!
इतिहासतज्ज्ञ मोहन शेटे यांचे उद्गार : पूना गेस्ट हाऊसतर्फे विशेष व्याख्यान !!
पुणे : ‘रणधुरंधर बाजीराव पेशवे यांनी अवघ्या 28व्या वर्षी मुत्सद्देगिरी, योजनाबद्ध रणनीती, अचूक डावपेच आणि तळपत्या पराक्रमाने गाजवलेली पालखेडची लढाई, ही जागतिक स्तरावरील मास्टरपीस लढाई मानली जाते. जगभरातील लष्करी प्रशिक्षण संस्थांमध्ये पालखेडची लढाई आजही अभ्यासली जाते.
अशा युद्धमोहिमांचे सेनापतीपद भूषवलेल्या बाजीराव पेशव्यांच्या स्मृती आपल्याला प्रेरणादायी आहेत’, असे उद्गार इतिहास तज्ज्ञ, भाष्यकार मोहन शेटे यांनी सोमवारी येथे काढले.पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान आणि पालखेड युद्ध स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. पूना गेस्ट हाऊस येथे झालेल्या या कार्यक्रमात शेटे यांनी ‘अजिंक्य योद्धा बाजीराव व पालखेडची लढाई’ या विषयावर विचार मांडले.
एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले अध्यक्षस्थानी होते. पेशवे यांचे वंशज पुष्करसिंह विनायकराव पेशवा, माजी खासदार प्रदीप रावत, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्यासह अदिती अत्रे, प्रशांत गोऱ्हे, महेश लडकत, स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक विद्याधर नारळकर आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
पूना गेस्ट हाऊस येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान मोहन शेटे यांचा सत्कार करताना भूषण गोखले. समवेत किशोर सरपोतदार, प्रदीप रावत.
शेटे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केले, त्याचे पेशव्यांनी साम्राज्य केले, हा इतिहास आपण जागता ठेवला पाहिजे. पेशव्यांनी आपल्या पराक्रमाने, मुत्सद्देगिरीने मराठ्यांचा प्रभाव थेट पेशावरपर्यंत निर्माण केला होता. त्यातील सर्वांत प्रभावी योगदान बाजीराव पेशव्यांचे होते. त्यातही पालखेडची निजामाविरुद्धची लढाई, हा बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाच्या गाथेतला तेजस्वी अध्याय आहे. पालखेडची लढाई हा बाजीरावांच्या रणकौशल्याचा अद्भुत नमुना आहे. आपल्याला सोयीची आणि शत्रूला गैरसोयीची, अशी जागा युद्धक्षेत्र म्हणून निवडण्यात त्यांचे कौशल्य प्रकट झाले होते.
ज्या तोफखान्यावर निजामाची भिस्त होती, तो तोफखाना बाजीरावांनी आपल्या मुत्सद्देगिरीने आणि अचूक डावपेचांनी नदीपलीकडे रोखण्यात यश मिळवले होते. शत्रूच्या हेरांना गाफील ठेवत आपल्या सैन्यसंख्येविषयी शत्रूला नेमकी माहिती मिळू न देण्याचे डावपेच ते खेळले होते. निजामाच्या फौजेचे पाणी तोडण्यात त्यांनी यश मिळवले आणि अनेक बाजूंनी शत्रूची कोंडी करून, पराक्रमाची शर्थ करून बाजीरावांनी ऐन तारुण्यात युद्धमोहिमांचा आदर्श निर्माण केला.
पूना गेस्ट हाऊस येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना मोहन शेटे. समवेत पुष्करसिंह विनायकराव पेशवा, भूषण गोखले.
‘छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण करताना जी अखिल हिंदुस्थानच्या मुक्ततेची संकल्पना ठेवली, तिचेच अनुकरण बाजीरावांनी त्यांच्या हयातीत केले आणि मराठी सैन्याने थेट पेशावरपर्यंत दरारा निर्माण केला. मुघलांच्या साम्राज्यात सरदेशमुखीचे अधिकार मिळवले. मुघलांच्या दिल्लीतील रक्षणाची हमी घेतली आणि निभावली. नर्मदेपलीकडे त्यांनी मराठी सरदारांची पराक्रमी घराणी स्थापन केली.
त्यांनी महाराष्ट्रापुरता विचार न करता अखिल हिंदुस्थानचा विचार केला, हे महत्त्वाचे आहे. बाजीरावांनी या विचाराला कृतीची जोड दिली आणि पेशव्यांच्या पुढील वंशजांनीही त्याचे अनुकरण केले. बाजीरावांचे हे अलोकिक कर्तृत्व आजही अनुकरणीय आणि प्रेरणादायी आहे,’ असे शेटे म्हणाले.
एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले, ‘बॉर्डर्स (सीमा) आणि फ्राँटियर्स (प्रभावक्षेत्रे) यांचा नेमका विचार छत्रपती शिवरायांप्रमाणेच बाजीरावांनी केलेला दिसतो. आधुनिक काळात अवकाश आणि समुद्रतळ, ही अशीच फ्राँटियर्स आहेत, ज्यांचा विचार आपले राजकीय नेतृत्व करत आहे. तो अधिक गतीने आणि प्रभावीपणे होण्याची गरज आहे. यासाठीची प्रेरणा बाजीरावांच्या कर्तृत्वातून मिळते’.
प्रदीप रावत म्हणाले, ‘मराठ्यांच्या इतिहासातले पेशव्यांचे योगदान हे इतिहासातील अपूर्व योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे विशाल रूप पेशव्यांनी साकारले, हे प्रेरक आहे’.
प्रशांत गोरे यांनी पालखेड येथे लवकरच बाजीराव पेशवे यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात येणार असल्याची माहिती दिली. बाजीरावांच्या पराक्रमाची गाथा असणारी पालखेडची लढाई एक लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माधुरी जोशी यांनी सूत्रसंचालन केले. अभय सरपोतदार यांनी स्वागत केले. भास्कर गोखले यांनी प्रास्ताविक केले. पूना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार यांनी आभार मानले तर अजित कुमठेकर यांनी संयोजन केले.
अयोध्येतील 15 फूटांची कढई पुण्यात
प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घानप्रसंगी केलेल्या शिरा प्रसादाच्या निर्मितीची कथा ऐकवली. तब्बल 15 फूट आकाराची कढई, 700 किलो तूप, हजारो किलोंचा रवा, 12 हजार किलो साखर, 350 किलो केळी, 75 किलो वेलची पावडर, 800 किलो सरपण… अशा अविश्वसनीय आकडेवारीसह तयार केलेला हा शिरा प्रसाद अयोध्येत सकाळी 10 ते रात्री 11 या वेळेत भाविकांना वाटण्यात आला.
केळ्यांच्या मागावर आलेल्या माकडांच्या टोळीसाठी खास व्यवस्था केल्याचेही ते म्हणाले. ही प्रसादाची कढई येत्या रामनवमीला पुण्यात आणण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
जाहिरात