गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पालखेडच्या लढाईतील बाजीराव पेशवे यांच्या रणनेतृत्वाचे जगभरातून कौतुक : मोहन शेटे !!
सहजीवन गणेशोत्सव मित्र मंडळ ट्रस्टतर्फे ‘पालखेडची लढाई’ विषयावर व्याख्यान !
पुणे : पालखेडच्या लढाईत निजामाला पराभूत करण्यासाठी जी रणनिती आखली गेली होती त्या रणनितीचे जागतिक पातळीवरील युद्ध तज्ज्ञांनी कौतुक केले आहे. या लढाईत बाजीराव पेशवे यांचे रणनेतृत्व, सेनापतीचे कौशल्य दिसून येते. आपल्या सैन्याची हानी होऊ न देता बलाढ्य शत्रूचा पूर्ण पराभव केला.
पालखेडची लढाई जिंकल्यामुळे दक्षिण भारतावर मराठ्यांचे प्रभुत्व सिद्ध झाले त्यामुळे अटक ते कटक असे साम्राज निर्माण होऊ शकले, अशी माहिती इतिहास प्रेमी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, प्रसिद्ध व्याख्याते मोहन शेटे यांनी दिली.
इतिहासाचे अभ्यासक मोहन शेटे यांचे स्वागत करताना सहजीवन गणेशोत्सव मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष नितीन पाटील. समवेत आदिती अत्रे, मदन कटारिया.
सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या सहाकारनगरमधील सहजीवन गणेशोत्सव मित्र मंडळ ट्रस्टतर्फे मोहन शेटे यांचे ‘पालखेडची लढाई’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
पेशवे घराण्याच्या वंशज आदिती अत्रे, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे, पालखेड युद्ध स्मारक समितीचे संस्थापक सदस्य प्रशांत गोरे, इतिहास संशोधन मंडळाचे जगन्नाथ लडकत, रमेश भागवत आदी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष नितीन पाटील, विनय कुलकर्णी, उत्सव सोहळ्याचे अध्यक्ष मदन कटारिया, रोहन पूरकर, अमित कुलकर्णी यांनी केले.
लोकमान्य टिळक यांनी ज्या हेतूने गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली तो हेतू सहजीवन गणेशोत्सव मित्र मंडळ ट्रस्ट आयोजित कार्यक्रमातून साध्य होत असल्याचे सांगून शेटे यांनी सुरुवातीस मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. शेटे यांनी सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा इतिहास कथन केले. पालखेडची लढाई या विषयी बोलताना ते म्हणाले, पालखेडच्या लढाईचे दूरगामी परिणाम संपूर्ण देशात दिसून येतात.
सहजीवन गणेशोत्सव मित्र मंडळ ट्रस्ट आयोजित व्याख्यान बोलताना मोहन शेटे. समवेत कुंदनकुमार साठे, नितीन पाटील, आदिती अत्रे आणि मदन कटारिया.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली त्याचे रुपांतर साम्राज्यामध्ये करण्याचे काम बाजीराव पेशवे यांनी केले. स्वराजाचा विस्तार करताना, परकीयांना हुसकावून लावताना बाजीराव पेशवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याच युद्ध नीतीचा अवलंब केला.
सुरुवातीस मंडळाचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी मंडळाच्या वाटचालीचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा फुलकर यांनी केले. आभार नितीन पाटील यांनी मानले.
जाहिरात