गोल्डन आय न्युज नेटवर्क
रसिकांनी अनुभवली सुरेल मैफल..!
गानवर्धनतर्फे कल्याणी देशपांडे यांचा युवा सतारवादक पुरस्काराने गौरव !!
पुणे : युवा सतारवादक कल्याणी देशपांडे यांचे प्रभावी वादन आणि ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित रघुनाथ पणशीकर यांच्या सुरेल गायनाने रसिकांची सायंकाळ संस्मरणीय ठरली.
निमित्त होते गानवर्धन आयोजित युवा सतारवाद पुरस्कार वितरण सोहळ्याचे!
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रात गेली 44 वर्षे कार्यरत असणाऱ्या गानवर्धन संस्थेतर्फे युवा सतारवादक पुरस्काराने पुण्यातील कल्याणी देशपांडे यांना गौरविण्यात आले. सोमवारी (दि. 27) एस. एम. जोशी सभागृहा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गानवर्धन संस्थेतर्फे कीर्तन संजीवनी कै. पुष्पलता रानडे पुरस्कृत कै. सुचेता नातू यांच्या समरणार्थ हा पुरस्कार दरवर्षी युवा कलाकाराला दिला जातो.
शाल, सन्मानचिन्ह आणि दहा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे सुरेश रानडे, जयश्री रानडे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर, सचिव रवींद्र दुर्वे स्वरमंचावर होते.
कृ. गो. धर्माधिकारी आणि प्रभाताई अत्रे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून पुरस्काराविषयी बोलताना सुरेश रानडे म्हणाले, ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ आणि ‘ज्ञानदीप लावू जगी’ याच उक्तीप्रमाणे पुष्पलता रानडे यांचे जीवन होते.
आयुष्यभर त्यांनी गरजू लोकांना दानधर्म केला आणि कलेची सेवा करणाऱ्या मदतीचा हात दिला. सुचेता नातू या उत्तम सतार वाजवित असल्याने त्यांच्या स्मरणार्थ पुष्पलता रानडे यांनी पुरस्कार देण्यास सुरुवात केली.
पुरस्काराला उत्तर देताना कल्याणी देशपांडे म्हणाल्या, गुरू आणि आईवडिलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करते.
देणाऱ्याचे हात हजारो’ अशी माझी आता अवस्था झाली आहे. संगीताची जोपासना करणाऱ्या सर्वसामान्य अशा घरात माझा जन्म झाला. संगीत क्षेत्रात पूर्णवेळ काम करणे करण्यासाठी धाडसच लागते.
पण कलेसाठी घरातून पाठींबा मिळाल्यामुळेच संगीताच्या क्षेत्रात वाटचाल करू शकत आहे. संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्यासारख्या एका विद्यार्थिनीला गानवर्धन संस्थेने पुरस्कार दिल्यामुळे मी योग्य मार्गाने जात आहे, अशी माझी भावना आहे. गानवर्धन संस्थेचा पुरस्कार जबाबदारी वाढविणारा आणि भविष्यातील वाटचालीसाठी प्रोत्साहन देणारा आहे.प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली.
प्रमुख अतिथीचा सत्कार दयानंद घोटकर यांनी केला. विश्वस्त सुजाता लिमये यांनी सूत्रसंचालन व मान्यवरांचा परिचय करून दिला.पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर कल्याणी देशपांडे यांचे सतारवादन झाले. त्यांना राग पुरियाधनाश्री सादर सादर करताना आलाप, जोड-झाला, गतमध्ये मध्यलय रूपक आणि तीनताल बहारदारपणे सादर केला. त्यांना महेशराज साळुंखे (तबला) यांनी समर्पक साथसंगत केली.
कार्यक्रमाच्या अखेरच्या सत्रात प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित रघुनंदन पणशीकर यांचे गायन झाले. त्यांना भरत कामत (तबला), अमेय बिच्चू (संवादिनी), सौरभ काडगावकर, शुभम खंडाळकर, राधीका जोशी (तानपुरा) यांनी साथसंगत केली.कलाकारांचे स्वागत सुरेश रानडे आणि जयश्री रानडे यांनी केले.
————————————-–———————-
जाहिरात