गोल्डन आय न्युज नेटवर्क
नाटक-मालिका हा पूर्णवेळ व्यवसाय; शॉर्टकट नाही !!
नेक्स्ट जेन करिअर फेस्ट प्रदर्शनात ‘नाटक व मालिकांमधील हटके करियर’ विषयावर कार्यक्रम !
पुणे : नाटक-मालिका हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही. या क्षेत्रात पैसा, प्रसिद्धी आहे. नाटक-मालिका करणे हा पूर्णवेळ करण्याचा व्यवसाय असून यात शॉर्टकट नाही. या क्षेत्रात स्थिरावण्यासाठी प्रचंड मेहनत आवश्यक आहे, असे मत नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलावंतांनी आज व्यक्त केले.
अस्पायर नॉलेज ॲन्ड स्किल्स, संवाद पुणे आणि हाऊस ऑफ सक्सेसतर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे मॅनेजमेंट असोसिएशन, भावार्थ यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या नेक्स्ट जेन करिअर फेस्ट प्रदर्शनातील अखेरच्या दिवशी ‘नाटक व मालिकांमधील हटके करियर’ या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत, अभिनेते जयवंत वाडकर, मुग्धा गोडबोले, पुष्कर श्रोत्री, अभिनय बेर्डे हे ‘आज्जीबाई जोरात’ या पहिल्या एआय महानाटकातील कलाकार तसेच निर्माते दिलीप जाधव सहभागी झाले होते.
‘नाटक व मालिकांमधील हटके करियर’ कार्यक्रमात सहभागी कलाकार.
बालनाट्यापासून विद्यार्थ्यांनी सुरुवात करावी असा सल्ला देऊन जयवंत वाडकर म्हणाले, नाट्यक्षेत्रात येण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. शालेय-महाविद्यालयीन जीवनात स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यास नाट्यनिर्मितीची सर्व प्रक्रिया समजून घेता येते.
पुष्कर श्रोत्री म्हणाले, नाटकाचा आधीअभ्यास करा मग लोकांसमोर या. नाटकाची गोष्ट सांगण्याची हतोटी निर्माण झाल्यास या क्षेत्रात यश मिळू शकते.
मुग्धा गोडबोले म्हणाल्या, नाटक-मालिकांमध्ये जाण्याचा मार्ग सोपा नाही. प्रसिद्धी मिळत असली तरी मेहनत ही घ्यावी लागतेच. अभिनयाबरोरब लेखन क्षेत्रही मोलाचे आहे. पण ठराविक वेळ लिखाणासाठी देतो किवा देते असे म्हणून चालत नाही. लेखनासाठीही पुरेसा वेळ द्यावाच लागतो.
‘आज्जीबाई जोरात’ या पहिल्या एआय महानाटकाला रसिकांची पसंती मिळाली आहे. या नाटकाच्या निर्मितीचा प्रवासही कलाकारांनी उलगडला.
निर्माते दिलीप जाधव म्हणाले, भव्यदिव्य नाट्यकृती रंगभूमीवर आणण्याचा विचार अनेक दिवसांपासून होता. या निमित्ताने एक वेगळी कलाकृती रसिकांसमोर आणली आहे. लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाला या नाट्यकृतीतून आनंद मिळत आहे याचा आनंद आहे.
‘जाऊबाई ते आज्जीबाई’ हा प्रवास जोरातच असल्याचे सांगून निर्मिती सावंत म्हणाल्या, या नाटकामुळे आजी घराघरात पोहोचली आहे.
मुग्धा गोडबोले म्हणाल्या, कलाकाराने एकतरी तांत्रिक बाजू शिकलीच पाहिजे. लाईट, नेपथ्य याच्या जोडीने एआय या आणखी एका तांत्रिक बाजूचा समावेश झाला आहे.
एआयसारख्या आधुनिक तंत्राचा वापर चांगल्या गोष्टींसाठी व्हावा, अशी अपेक्षा सर्वच कलाकारांनी व्यक्त केली. एआयच्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत आले तर आवडेचल पण त्यांचे ‘टायमिंग’ कुठून आणणार असा प्रश्नही उपस्थित केला. कलाकारांशी कीर्ती जोशी यांनी संवाद साधला.
सुरुवातीस सुनील महाजन यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती सांगितली. डॉ. संजय गांधी, समिधा गांधी, सुनील महाजन, प्रसाद मिरासदार यांनी कलाकरांचे स्वागत केले.
—————————————-––—————–
जाहिरात